मंगळवार, २१ जुलै, २०२०

आठवणीतल्या गोष्टी - पुस्तके आणि वह्या


३० एप्रिलला वार्षिक परिक्षेचा निकाल लागला की एक महत्त्वाचं काम असायचं ते म्हणजे अभ्यासाच्या वह्या - पुस्तकांचे कपाट आवरणे. आई अधून मधून आठवण करून द्यायची पण काम पुढे ढकलण्यासाठी निकालाचे नुसते निमित्त. मग एकदाचे सगळे कपाट काढून जुन्या क्रमिक पुस्तकांचे गठ्ठे बांधून ठेवायचे. शाळेत किंवा इतर कोणाला हवी असतील तर तिथे ते गठ्ठे नेऊन पोचवायचे. इतर व्यवसायमाला, शाळेच्या प्रश्न मालिका वगैरे धाकट्या भावंडांसाठी नीट बाजूला ठेवून द्यायच्या. पुस्तके आवरून झाली की वह्यांकडे मोर्चा.


Gift Idea: Homemade Journals | Homemade journal, Diy book, Diy journal
           जुन्या वह्यांमधले कोरे कागद काढून त्याच्या वह्या बनवणे हा एक आवडीचा उद्योग असे. दर वर्षी बाबा माझ्याकडून आणि शुभदाकडून अतिशय सुबक आणि नेटकेपणाने या वह्या बनवून घेत. आधी कागद नीट लावून घायचे, दोन्ही बाजूंनी समान अंतरावर भोकं पाडून, पुढे-मागे जाड दोऱ्याने व्यवस्थित शिवून,पक्की गाठ मारून, उरलेला दोरा नीट कापून मग त्यावर एक छोटी चिकटपट्टी चिकटवायची. कव्हरवर एखादे चित्र काढायचं किंवा जुन्या निमंत्रण पत्रिकांवरची चित्रं लावून कोलाज करायचा. 'Reduce, Reuse, Recycle' अशी 'Sustainability' ची सूत्रं अशी घरीच हातोहात शिकायला मिळत होती .
           पुढे मग कधीतरी शाळेजवळ एक बाइंडिंगचे दुकान आहे, तिथे कागद दिले की - दिवसांत  वह्या करून मिळतात असं कळलं. पण त्या वह्यांना घरी केलेल्या वह्यांची सर नव्हती. एकतर चारी बाजूनी कागद कापून त्यांचा आकार छोटा व्हायचा. दिलेल्या सगळ्या पानांच्या मजबूत दोन तीनच  जाड जाड वह्या तयार व्हायच्या. लाल किंवा निळे रेक्झिन आणि पुढे -मागे पुठ्ठा. त्याला लावलेली खळ किंवा डिंक याचा असा काही भयंकर वास यायचा की वही हातात सुद्धा धरवत नसे आणि एकदम जाड असल्याने पान दुमडून लिहिणं पण कठीण. मग आम्ही आमचा घरी वह्या बनवायचा कुटीरोद्योगच चालू ठेवला.
           सुट्टीतल्या अभ्यासाची वही म्हणजे एक गंमतच होती. मी तिसरी -चौथीत असताना बाबा मला रोज सकाळी शुद्धलेखन द्यायचे. साधारण दहा ओळी  लिहून त्यांना दाखवायच्या. हस्ताक्षर आणि शुद्धलेखनाला ते मला दहापैकी एक,दीड , दोन असे मार्क देत असत . १०-१२ दिवसांत गाडी साडेतीन मार्कांपर्यंत गेलीआणि या गतीने आपल्याला - मार्क कधी मिळणार? ह्यात काही अर्थ नाही असं स्वतःच ठरवून मी ती वही बंद करून टाकली.
           मे महिना संपत आला की नवीन पुस्तकांचे वेध लागायचे. टिळक रोडवरचं 'आनंद पुस्तक मंदिर ' म्हणजे आमचं हक्काचं पुस्तकांचं दुकान. मध्येच कधीतरी टिळक रोडवर गेलं की दुकानात चक्कर मारून यायची. " काका , आली  का हो पुस्तकं?". दरवर्षी एखादं पुस्तक तरी उशीरा छापून यायचं. मग ते सांगायचे, "पुढच्या आठवड्यात या". पाऊस सुरू व्हायच्या आत पुस्तकं खरेदीची गडबड. त्या वेळेस मला तासनतास त्या दुकानात थांबावंसं वाटायचं. नवीन पुस्तकांचा तो वास. आजही त्याची आठवण आली की अंगात वेगळाच उत्साह संचारतो.  दुकानात जिकडेतिकडे वह्या -पुस्तकांचे गठ्ठेच गठ्ठे. इयत्तेप्रमाणे, विषयाप्रमाणे पुस्तकं, शिवाय नकाशाचे कागद, आलेखनाचे कागद. वह्यांचे पण किती प्रकार. एक रेघी, दु रेघी, पाचवीत इंग्रजीसाठी चार रेघी, शिवणासाठी पानांवर चौकोन असलेली, कधी फुलस्केप, मुख्य विषयांना २०० पानी, बाकी १०० पानी, चित्रकलेची वेगळी आणि एक मोठी रफ वही अशी वह्यांची पण यादी असायची. वह्या घ्यायला वेळ लागायचा कारण वहीवरची चित्रं बघून, आतली पानं बघून मग खरेदी. मुलांपेक्षा जास्त उत्साहात काका आणि दुकानातली इतर माणसं प्रत्येकाची मागणी पुरवत असत. त्यांची ती धांदल बघून आपण काही दिवस या दुकानात काम करून त्यांना मदत करावी असं मला दर वर्षी वाटत असे.
           खरेदी करून घरी येतानाचा आनंद अवर्णनीय!! आधी मी मराठी आणि इतिहासाचं पुस्तक उघडून बघायचे. कधी कधी गुळगुळीत पानांवर तर कधी साधी चित्रं असायची. मला चित्रकाराचे नाव आठवत नाहीये, google करायचा प्रयत्न केला, पण नदीचे दोन्ही  हिरवेगार काठ, त्याचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब ह्याचं इतकं सुंदर चित्रं मराठीच्या एका पुस्तकात होतं, अजूनही ते माझ्या डोळ्यासमोर आहे. एक्सप्रेसवेच्या आधी एक नदीवरचा पूल लागतो तेव्हा हमखास ते चित्रं मला आठवतं. सगळी चित्रं, नकाशे बघून झाले की मग  बाकीची पुस्तकं चाळून आतली पानं वगैरे व्यवस्थित आहेत ना बघायचं
Blank Diary notebook graffiti 30 sheets Sketch Book kraft cover ...
आता पुढचा  कार्यक्रम म्हणजे पुस्तकांना कव्हर्स घालणे (तेव्हा आम्ही कव्हरं म्हणायचो). मोठी सतरंजी घालून सगळ्यांची पुस्तकं बाहेर काढायची. गुळगुळीत, फ्रेश रंगाचा ब्राऊन पेपर घेऊन, मग एकंदरीत पुस्तकांच्या हिशोबाने त्याचे मोठे तुकडे करणं, बाजूचे त्रिकोण कापून घड्या दुमडणं, नावासाठी लेबल चिकटवणं…. गप्पांच्या नादात काम कधी संपायचं ते कळायचेही नाही. मग प्रत्येक विषयाच्या वह्या. कधीतरी मी ४०० पानी वही आणून, वरच्या समासात खाचा करून, त्यावर विषयांची नावं घालून , एकच वही ४ विषयांसाठी वापरली होती. माझा मामेभाऊ हेमंत कॉम्पुटर फॉन्टला लाजवेल इतक्या सुंदर अक्षरात सगळ्या वह्यापुस्तकांवर नावं घालून द्यायचा. अशी सगळी तयारी झाली की प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मग दप्तरात ठेवायची म्हणजे छत्री / रेनकोटमधून दप्तर भिजले तरी पुस्तकं भिजायला नकोत. नंतर प्लास्टिकची कव्हर्स पण मिळायला लागली. नुसतं पुस्तक खोचलं की  काम झालं पण ती काही मला फार भावली नाहीत. 
           शाळेच्या पुस्तकांशिवाय आमच्या घरी इतरही खूप पुस्तकं होती. रद्दी विकून जे काही पैसे येतील त्याची पुस्तकं आणायची हे ठरलेलं . शिवाय भेट मिळालेली, स्पर्धेची बक्षिसं म्हणून मिळालेली, काही बाबांच्या वेळची जुनी अशी सगळी पुस्तकं आम्ही त्यांच्या उंची आणि जाडीप्रमाणे लाकडी स्टॅण्डवर लावून ठेवली होती. एक वर्ष सुट्टीत त्यांना कव्हर्स घालायची टूम काढली. बाबांनी एकदम जाड ब्राऊन पेपर आणून दिला. इतका मजबूत की आज ३५-४० वर्षांनंतरही त्यातली अनेक पुस्तकं व्यवस्थित कव्हर्ससहित माझ्या कपाटात आहेत.
           सोनियाच्या निमित्ताने शाळेची ही खरेदी पुन्हा एकदा अनुभवता आली. अजूनही मे -जून मध्ये अप्पा बळवंत चौकात गेलं की वह्यांच्या स्टॉलला भेट देऊन चांगल्या डझनभर वह्या घ्यायचा मला मोह होतो. आता घरात खूप पुस्तकं झाली आहेत. काही दिवस तरी नवीन घायची नाहीत असं ठरवलं तरी ऑफिसमध्ये पुस्तक प्रदर्शन लागलं की राहवत नाही. नवीन पुस्तक घेऊन त्यावर नाव, तारीख घालताना मला तितकाच आनंद होतो.  
           मायक्रोसॉफ्ट ऑफिस, स्मार्ट फोन असे सगळे स्वीय सचिव हाताशी असूनही माझी भिस्त अजूनही माझ्या वहीवरच आहे. रोजची कामं, मीटिंग्सच्या नोट्स, वैयक्तिक महत्त्वाच्या नोंदी अशा सगळ्या माझ्या वेगवेगळ्या वह्या आहेत. कधीतरी ड्रॉवर आवरताना जुन्या वह्या सापडतात. वाचताना मजा येते. त्या फाडून मी परत दुसऱ्या वह्या ठेवायला जागा करते. ह्या-पुस्तकांचं कपाट आवरायचा माझा उद्योग बहुधा माझ्याबरोबरच थांबेल असं वाटतंय . 

p.c. Google

शनिवार, १८ जुलै, २०२०

आठवणीतल्या गोष्टी - दप्तर


           काही दिवसांपूर्वी एका मीटिंगसाठी ऑफिसला जायची वेळ आली . १७ मार्च पासून पूर्ण वेळ घरीच काम चालू होते . आता जवळपास अडीच तीन महिन्यांनी ऑफिसला जाताना शाळेचा पहिला दिवस आठवला.

पावसाची भुरभूर चालू होती. रस्त्यावर फारशी वर्दळ नाही. पण खूप दिवसांनी रोजचा रस्ता पाहिला आणि एखादा जुना सवंगडी भेटल्यासारखे वाटले. काही दिवसांसाठी आई घरी राहायला आली असल्याने तिने डबा करून आणि भरून पण दिला होताबरोबर पाण्याची बाटली. आदल्या दिवशी रात्री इस्त्रीचे कपडे बाजूला काढून ठेवले होते , ऑफिसचा टॅग शोधून ठेवला होता , इतके दिवस बाजूला ठेवलेली लॅपटॉप बॅग पुसून  एकदम चकाचक करून ठेवली होती. मला एकदम "नॉस्टॅल्जीक " वाटायला लागलं आणि शाळेतल्या दिवसांच्या एकेक आठवणी जाग्या झाल्या .
         'दप्तर' ही अशी एक गोष्टं होती की  जी शाळेत जायला लागल्यावरच मिळायची. छोट्या गटात फक्त डब्याची पिशवी असायची. प्राथमिक शाळेपासून दप्तर. लहान आकाराचं , साधारण पाटी आणि - वह्या -पुस्तकं मावतील असं तपकिरी , निळं , करड्या किंवा अश्याच ठराविक मळखाऊ रंगाचं दप्तर. चपटा डबा किंवा कंपास पेटी ठेवायला बाहेर एक कप्पा आणि फुटपट्टी ठेवण्यासाठी खाली एक आडवा कप्पा. मला त्या कप्प्याचे फार आकर्षण होते . मी शंभरदा तरी ती लाकडाची   पट्टी ठेवायचे - काढायचे.  फारच भारी दप्तर असेल तर नावाची चिठ्ठी अडकवायला एक छोटा प्लास्टिकचा कप्पा असे आणि ज्याच्याकडे असे दप्तर असेल तो फारच भाव खायचा.
       मी 'जिजामाता बालक मंदिर ' या छान छोट्या प्राथमिक शाळेत होते. भरत नाट्य मंदिरासमोर डॉ ढमढेऱ्यांच्या वाड्यात शाळा भरायची. बसायला सतरंजीच्या लांबच लांब पट्ट्या घातलेल्या असत. दिवसभर बहुधा मांडीवर किंवा पुढ्यात दप्तर ठेवायचो.  
           पुढे पाचवीत मोठ्या शाळेत गेल्यावर मोठे खाकी रंगाचे दणकट दप्तर आणले. एकदा आणले की ४ वर्ष तरी टिकावे ही अपेक्षा. हातात धरायचे किंवा खांद्यावर अडकवायचे.   दप्तराच्या वजनानुसार पट्ट्याची लांबी कमी जास्त करणे हा एक उद्योग असे. पुढे मग सायकल वापरायला लागल्यावर कॅरियरला दप्तर लावायचे आणि अधून मधून  हात मागे लावून दप्तर जागेवर आहे ना ते पाहायचे. मग पाठीवर मागच्या बाजूला लावायची पण दप्तरे मिळायला लागली. काही काही मुली शाईने दप्तरावर नाव घालत . त्या कापडावर शाई फुटत असल्याने बरेचदा ती अक्षरे मोठी व्हायची

Aluminum school box...used to have this in school...for a brief ...काही मुलींकडे अलुमिनियमच्या पेट्या असत. एकदम स्मार्ट. त्याचा चकचकीतपणा मोहवून टाकी पण त्या एका हातात धराव्या लागतात मग जड होतात त्यापेक्षा आपले दप्तरच बरे अशी आम्ही स्वतःची समजूत घालत असू .


         रोज सकाळी किंवा रात्री दप्तर भरणे का एक कार्यक्रम असे. टाईम टेबल प्रमाणे वह्या -पुस्तके काढणे- ठेवणे, मग इतर मालिकेच्या वह्या, स्वाध्यायच्या वह्या, किंवा व्यवसायमाला, शिवणाचे साहित्य, रंगपेटी, ब्रश अश्या बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवून भराव्या लागत. एखादी महत्वाची गोष्ट घरी विसरली की उगाच बाईंचे बोलणे खावे लागे. ज्या मुलींची घरं जवळ असत त्या पटकन मधल्या सुट्टीत घरून काही विसरले तर घेऊन येत. शाळेची सगळी वर्षं टाकीच्या नळाचे पाणी ओंजळ करून प्यायचो त्यामुळे 'टिफिन बॅग, वॉटर बॅग' असं काही नसायचं. दप्तराच्या बाहेरच्या कप्प्यात डबा. रस भाजी असेल तर कागदात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत. असा सगळा सुटसुटीत मामला होता.
         काही मुली दप्तर भरण्याच्या बाबतीत पण एकदम शिस्तशीर होत्या. तासानुसार एका बाजूला पुस्तके, मध्ये पुठ्ठा, दुसरीकडे त्याच क्रमाने वहया. तास संपला की ती पुस्तके खाली जाऊन पुढची पुस्तके वर येत. असं दप्तर भरायचा माझा उत्साह काही महिने टिके. पण माझ्या एका मोठ्या भावाने तर मला या बाबतीत फारच अगाध ज्ञान दिले. माझं दप्तर बघून तो म्हणाला, " तू एवढी जड पुस्तकं कशाला नेतेस ? मी तर जो धडा चालू आहे तेवढीच पुस्तकाची पानं घेऊन जातो!!"
       पण माझ्या दप्तरात तर वह्या पुस्तकांशिवाय इतरही खूप गंमती जंमती असत. मला रंगीबेरंगी पिसं जमवायचा छंद होता. माझी पिसं ठेवायची एक खास वही होती. दर - पानांआड एक एक रंगीत पीस ठेवलं होतं. इतर मुली पण त्यांची पिसं आणत. मग मधल्या सुट्टीत पिसांची देवाण घेवाण चाले. मोठ्या पिसाजवळ लहान पीस असेल किंवा दोन रंगांचे पीस असेल तर त्याची किंमत (value) फारच जास्त असे.
         बादशाहीच्या बोळात एका बकुळीच्या झाडाखाली छान सडा पडायचा, मग ती फुलं वेचून ठेवायला छोटीशी डबी. पुढे कधीतरी काड्यापेट्यांवरची चित्रं जमवायचा छंद लागला, मग त्याची एक बॉक्स. जाळी पडलेली पानं, गुलाबाच्या पाकळ्या , शेवरीची म्हातारी ,मोरपिसं , अभ्रकाचे पातळ पापुद्रे असा किती तरी खजिना दप्तरात सामावला असे. दप्तर म्हणजे आनंदाचं एक भांडारच होतं. तेव्हा घरात प्रत्येकाला स्वतंत्र खोली, कपाट असं काही नसायचं मग बरीचशी स्वतःची ' space ' त्या दप्तरातच मिळत असावी का?
            दुपारच्या शाळेत( म्हणजे ८वी ते १०वी ) गेल्यावर मुलींना शिंगं फुटतात असं बहुतेक सगळ्या शिक्षकांचं मत असे.त्याची एक खूण म्हणजे खाकी दप्तरापासून फारकत . शिवणाच्या वर्गात क्रॉस स्टिचने मोठ्या पिशवीवर भरतकाम  करायचे असे . मग सुट्टीत आईकडून लांब पट्ट्याची ती पिशवी शिवून घेतली की मग तीच दप्तर म्हणून वापरायला सुरुवात. तो पर्यंत,शुभदा, माझी मोठी बहीण कॉलेजला जायला लागल्याने रंगीबेरंगी, आरसे लावलेल्या, वेगवेगळ्या कापडाच्या 'शबनम' पिशव्यांशी पण ओळख झाली. इतके दिवस ठराविक कप्प्यांमध्ये शिस्तशीर बसवलेलं दप्तर शबनममध्ये एकदम मोकळं ढाकळं झालं. त्या अर्धवट वयातल्या विद्रोहाचीच तर निशाणी नव्हती नां ती ? 
         शाळा संपली , कॉलेज सुरू झालं .. संपलं . T square, drafter, drawing sheets ,journals .. दरवर्षी दप्तराचे आकार आणि प्रकार बदलत गेले पण जवळीक संपली नाही. आणि आता इतकी वर्षं नोकरी करतेय पण अजूनही मी 'लॅपटॉप बॅग' म्हणण्यापेक्षा 'माझं दप्तर ' असंच म्हणते. फक्त आता त्याच्यात अजून एका मोठ्या पर्सची भर पडली आहे. हे माझं दप्तर आणि पोतडी अजूनही प्रत्येक कप्प्यात खूप सारा खजिना बाळगून असतात पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी ..

आता उद्या दप्तरातले इतर सोबती.. 

रविवार, २८ एप्रिल, २०१९

जत्रेत हरवलेल्या मुलाची गोष्ट


            एका गावातला एक लहान मुलगा. अगदी उत्सुकतेने जत्रेची वाट पाहायचा. गावात वर्षातून एकदा भरणारी जत्रा. आई त्याला दरवर्षी घेऊन जात असे.  तऱ्हतऱ्हेच्या खेळण्यांची दुकानं, पिपाण्या ,शिट्ट्या, पिसांच्या टोप्या, बासऱ्या, रंगीत चष्मे, गलोल, चमकत्या तलवारी, गदा, गुलाबी रंगाचे 'बूढ़ी  के बाल'.  थोडंसं पुढे गेलं की की एक फोटो काढून मिळणारं दुकान.  चांद्रयान, राजवाडा, दाट जंगल असे देखावे आणि त्याच्यासमोर उभे राहून दोन मिनिटांत फोटो. आणि  मग एक आरश्यांचे दालन.  आरश्यात बघितलं की कधी खूप उंच, कधी जाड, कधी चित्रविचित्र चेहेरे दिसत. मुलाला ही  जत्रेतली गंमत दरवर्षी अनुभवायची असे. त्या वर्षीही तो असाच आईबरोबर जत्रेत गेला. नेहमीप्रमाणे बारीक-सारीक खरेदी झाली. पिपाण्या,टीप -टीप  वाजवून झाले. अजून थोडं पुढं गेलं की 'मेरी गो राऊंड ', चक्रातले पाळणे. आता पर्यंत तो कधीच चक्रात बसला नव्हता. थोडासा हट्ट करून त्याने आईकडून पैसे घेतले आणि तिचा हात सोडून तो धावत सुटला.
     स्वतःशीच गिरकी घेत गोलगोल फिरणाऱ्या कपबश्या, मेरी -गो -राऊंडचे  वर खाली होत पळणारे  हत्ती घोडे, हळूहळू वाढत जाऊन आता चक्कर येईल की काय असं वाटणारा वेग, चक्राचा  पाळणा वर जाताना वाटणारी धडधड आणि उंचावरून खाली येताना पोटात येणारा गोळा. सगळं त्याला खूप खूप आवडलं होतं. किती मजा !!

         एकामागून एक फेऱ्या घेण्यात तो रमून गेला. किती वेळ गेला कुणास ठाऊक आणि अचानक त्याला आईची आठवण झाली. आई कुठे गेली? आपण धावताना आईचा हात कधी सोडला तेच त्याला आठवेना. चक्रातून फिरताना आसपासच्या गर्दीत आई कुठे दिसते का? लांबवर कुठे उभी आहे का? त्याची नजर शोधू लागली. पण वेग इतका जास्त होता की नुसतेच रंग दिसत होते. तो कावरा बावरा झाला. कधी एकदा हे चक्र थांबतंय असं झालं. पाळण्यातून उडी मारून लगोलग आईकडे धावावं असं वाटायला लागलं. दरवेळेस पाळणा खाली आला की त्याला वाटे आता संपली चक्कर, पण परत वेग पकडून चक्र उंच जाऊ लागे. आता मात्र त्याला रडू यायला लागलं. चक्रातून फिरण्याची सगळी मजाच निघून गेली.  फिरत्या कपबश्या, मेरी -गो-राऊंड, आवाज करणारी खेळणी .. काही काही नकोसं झालं. त्याला फक्त आई हवी होती. फक्त आई. मायेनं कुरवाळणारी, घट्ट हात धरून आधार देणारी. तिचं फक्त 'असणं'च त्याला त्या क्षणी फार फार महत्त्वाचं होतं. फक्त तेवढंच महत्त्वाचं होतं...

परवा 'कविश्रेष्ठांच्या शब्दकळा' हा ज्येष्ठ कवी -कवयित्रींच्या कवितांवरचा दृक श्राव्य कार्यक्रम पाहताना, ऐकताना माझीही अवस्था त्या जत्रेतल्या  मुलासारखीच झाली. मनाच्या आत खोलवर जाणारे पं  अभिषेकींचे " हे सुरांनो चंद्र व्हा ","जिवलगा कधी रे येशील तू " अवीट गोडीचा आशा भोसलेंचा आवाज आणि सुधीर फडक्यांच्या चेहेऱ्यावरचे कौतुक, हृदयनाथांचे "ती गेली तेव्हा रिमझिम " ऐकताना घशात आलेला आवंढा, महानोरांची 'आई’ वरची कविता, कुसुमाग्रज, विंदा, बा भ बोरकर, सुधीर मोघे, सुरेश भट, इंदिरा संत, रॉय किणीकर या सगळ्यांच्या काळजाला हात घालणाऱ्या , अर्थवाही कविता आणि आशयघन शब्दांना सुरांचे कोंदण.

          त्या स्वरांबरोबर माझं मन नकळत भूतकाळात गेलं आणि मी स्वतःलाच विचारत राहिले, "कसा सोडला आपण सुरांचा घट्ट पकडलेला हात ? शब्द -लय -ताल कुठे मागे सोडून आलो आपण ?"

          Digital, Automation, Robotics, 5G, Machine Learning, Future Skilling, Blockchain, Virtual Reality …. सगळी लखलखती , मोहवणारी खेळणी . दरवर्षी नवीन जत्रा, नवीन खेळ. आपण स्वतःलाच ओळखू शकणार नाही असे आकार आणि चेहेरे दाखवणारे आरसे, खोट्या चंद्रावरचे विजयी मुद्रेचे फोटो, स्वतःचेच ढोल आणि पिपाण्या. आणखीनच वेगवान 'मेरी गो राऊंड ', एकमेकांशी वेगाची स्पर्धा करणारे हत्ती -घोडे, दरवर्षी जास्तच मोठे , उंचचउंच होत जाणारे चक्र ....
आणि या जत्रेत हरवलेली 'मी'...

 सुरांचा, तालाचा  हात सुटला म्हणून सैरभैर झालेली ….
पुन्हा पुन्हा तो हरवलेला गाता गळा शोधू पाहणारी …. कवितांना, शब्दांना घट्ट धरून ठेवू पाहणारी..
जत्रेच्या कोलाहलातून, आभासी दुनियेतून पुन्हा एकदा घराच्या अंगणात, तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर बसून ' मिराज़ -ए -गज़ल '  गुणगुणावेसे वाटणारी  ....

आता ते अंगणही नाही आणि ते तुळशीवृंदावनही.

पण…

पण कपाटात कवितांची सगळी पुस्तकं तशीच आहेत. आणि गाण्याची जुनी डायरी आणि नोटेशन्सही. जुन्या कॅसेट्स खराब झाल्या तरी गाणी तशीच आहेत.  

ते शब्दही अजून तितकेच खरे आणि मनाला भिडणारे आहेत. ते काव्य अमर आहे. अक्षय  आहे

जे सगळे स्वर्गीय सूर आणि संगीत ऐकत मोठे झालो ते चिरंतन आहे.

ते जसे आणि जिथे आहेत तिथे कायम आहेत, ठाम आहेत. कदाचित माझ्या नजरेपासून दूर गेले असतील पण ते अजरामर आहेत.
आणि ते तिथे तसेच आहेत हे जाणवून माझं मन परत शांत, निश्चिन्त झालंय.


          जत्रेतल्या चक्राचा पाळणा ठराविक फेऱ्यांनंतर थांबला. मुलाने पटकन बाहेर उडी मारली आणि समोर बघतो तर काय ... आई त्याची वाट बघत उभीच होती. तो धावत जाऊन तिला बिलगला. " कुठे गेली होतीस मला सोडून ?" असं तिलाच विचारू लागला. आईनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला  आणि त्याला जवळ घेत नेहमीसारखीच समजूतदारपणे हसली.  काहीही न बोलता .....

 वैशाली फाटक

२७ एप्रिल, २०१९