३०
एप्रिलला वार्षिक परिक्षेचा निकाल लागला की एक महत्त्वाचं
काम असायचं ते म्हणजे अभ्यासाच्या
वह्या - पुस्तकांचे कपाट आवरणे. आई
अधून मधून आठवण करून
द्यायची पण काम पुढे
ढकलण्यासाठी निकालाचे नुसते निमित्त. मग एकदाचे सगळे
कपाट काढून जुन्या क्रमिक पुस्तकांचे गठ्ठे बांधून ठेवायचे. शाळेत किंवा इतर कोणाला हवी
असतील तर तिथे ते गठ्ठे नेऊन पोचवायचे. इतर व्यवसायमाला, शाळेच्या
प्रश्न मालिका वगैरे धाकट्या भावंडांसाठी नीट बाजूला ठेवून
द्यायच्या. पुस्तके आवरून झाली की वह्यांकडे
मोर्चा.
जुन्या
वह्यांमधले कोरे कागद काढून
त्याच्या वह्या बनवणे हा एक आवडीचा
उद्योग असे. दर वर्षी
बाबा माझ्याकडून आणि शुभदाकडून अतिशय
सुबक आणि नेटकेपणाने या
वह्या बनवून घेत. आधी कागद
नीट लावून घायचे, दोन्ही बाजूंनी समान अंतरावर भोकं
पाडून, पुढे-मागे जाड
दोऱ्याने व्यवस्थित शिवून,पक्की गाठ मारून, उरलेला
दोरा नीट कापून मग
त्यावर एक छोटी चिकटपट्टी
चिकटवायची. कव्हरवर एखादे चित्र काढायचं किंवा जुन्या निमंत्रण पत्रिकांवरची चित्रं लावून कोलाज करायचा. 'Reduce, Reuse,
Recycle' अशी
'Sustainability' ची सूत्रं अशी घरीच हातोहात
शिकायला मिळत होती .
पुढे
मग कधीतरी शाळेजवळ एक बाइंडिंगचे दुकान
आहे, तिथे कागद दिले
की १-२ दिवसांत वह्या
करून मिळतात असं कळलं. पण
त्या वह्यांना घरी केलेल्या वह्यांची
सर नव्हती. एकतर चारी बाजूनी
कागद कापून त्यांचा आकार छोटा व्हायचा. दिलेल्या
सगळ्या पानांच्या मजबूत दोन तीनच जाड जाड वह्या
तयार व्हायच्या. लाल किंवा निळे
रेक्झिन आणि पुढे -मागे
पुठ्ठा. त्याला लावलेली खळ किंवा डिंक
याचा असा काही भयंकर
वास यायचा की वही हातात
सुद्धा धरवत नसे आणि
एकदम जाड असल्याने पान
दुमडून लिहिणं पण कठीण. मग
आम्ही आमचा घरी वह्या बनवायचा
कुटीरोद्योगच चालू ठेवला.
सुट्टीतल्या
अभ्यासाची वही म्हणजे एक
गंमतच होती. मी तिसरी -चौथीत
असताना बाबा मला रोज
सकाळी शुद्धलेखन द्यायचे. साधारण दहा ओळी लिहून त्यांना दाखवायच्या. हस्ताक्षर आणि शुद्धलेखनाला ते
मला दहापैकी एक,दीड , दोन
असे मार्क देत असत . १०-१२ दिवसांत गाडी
साडेतीन मार्कांपर्यंत गेलीआणि या गतीने आपल्याला
८-९ मार्क कधी
मिळणार? ह्यात काही अर्थ नाही
असं स्वतःच ठरवून मी ती वही
बंद करून टाकली.
मे महिना संपत आला की
नवीन पुस्तकांचे वेध लागायचे. टिळक
रोडवरचं 'आनंद पुस्तक मंदिर
' म्हणजे आमचं हक्काचं पुस्तकांचं
दुकान. मध्येच कधीतरी टिळक रोडवर गेलं
की दुकानात चक्कर मारून यायची. " काका , आली का
हो पुस्तकं?". दरवर्षी एखादं पुस्तक तरी उशीरा छापून
यायचं. मग ते सांगायचे,
"पुढच्या आठवड्यात या". पाऊस
सुरू व्हायच्या आत पुस्तकं खरेदीची
गडबड. त्या वेळेस मला
तासनतास त्या दुकानात थांबावंसं
वाटायचं. नवीन पुस्तकांचा तो
वास. आजही त्याची आठवण
आली की अंगात
वेगळाच उत्साह संचारतो. दुकानात
जिकडेतिकडे वह्या -पुस्तकांचे गठ्ठेच गठ्ठे. इयत्तेप्रमाणे, विषयाप्रमाणे पुस्तकं, शिवाय नकाशाचे कागद, आलेखनाचे कागद. वह्यांचे पण किती प्रकार.
एक रेघी, दु रेघी, पाचवीत
इंग्रजीसाठी चार रेघी, शिवणासाठी
पानांवर चौकोन असलेली, कधी फुलस्केप, मुख्य
विषयांना २०० पानी, बाकी
१०० पानी, चित्रकलेची वेगळी आणि एक मोठी
रफ वही अशी वह्यांची
पण यादी असायची. वह्या
घ्यायला वेळ लागायचा कारण वहीवरची चित्रं
बघून, आतली पानं बघून
मग खरेदी. मुलांपेक्षा जास्त उत्साहात काका आणि दुकानातली
इतर माणसं प्रत्येकाची मागणी पुरवत असत. त्यांची ती
धांदल बघून आपण काही दिवस
या दुकानात काम करून त्यांना
मदत करावी असं मला दर
वर्षी वाटत असे.
खरेदी
करून घरी येतानाचा आनंद
अवर्णनीय!! आधी मी मराठी
आणि इतिहासाचं पुस्तक उघडून बघायचे. कधी कधी गुळगुळीत
पानांवर तर कधी साधी
चित्रं असायची. मला चित्रकाराचे नाव
आठवत नाहीये, google करायचा प्रयत्न केला, पण नदीचे दोन्ही हिरवेगार
काठ, त्याचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब ह्याचं इतकं सुंदर चित्रं
मराठीच्या एका पुस्तकात होतं,
अजूनही ते माझ्या डोळ्यासमोर
आहे. एक्सप्रेसवेच्या आधी एक नदीवरचा पूल लागतो तेव्हा हमखास ते चित्रं मला आठवतं. सगळी चित्रं, नकाशे बघून झाले की मग बाकीची पुस्तकं
चाळून आतली पानं वगैरे
व्यवस्थित आहेत ना बघायचं.
आता पुढचा कार्यक्रम
म्हणजे पुस्तकांना कव्हर्स घालणे (तेव्हा आम्ही कव्हरं म्हणायचो). मोठी सतरंजी घालून
सगळ्यांची पुस्तकं बाहेर काढायची. गुळगुळीत, फ्रेश रंगाचा ब्राऊन पेपर घेऊन, मग
एकंदरीत पुस्तकांच्या हिशोबाने त्याचे मोठे तुकडे करणं,
बाजूचे त्रिकोण कापून घड्या दुमडणं, नावासाठी लेबल चिकटवणं…. गप्पांच्या
नादात काम कधी संपायचं
ते कळायचेही नाही. मग प्रत्येक विषयाच्या वह्या. कधीतरी मी ४०० पानी वही आणून, वरच्या समासात खाचा करून, त्यावर विषयांची नावं घालून , एकच वही ४ विषयांसाठी वापरली होती. माझा मामेभाऊ हेमंत
कॉम्पुटर फॉन्टला लाजवेल इतक्या सुंदर अक्षरात सगळ्या वह्यापुस्तकांवर नावं घालून द्यायचा.
अशी सगळी तयारी झाली की प्लॅस्टिकच्या
पिशवीत भरून मग दप्तरात ठेवायची म्हणजे छत्री / रेनकोटमधून दप्तर भिजले तरी पुस्तकं
भिजायला नकोत. नंतर प्लास्टिकची कव्हर्स पण मिळायला लागली. नुसतं पुस्तक खोचलं की काम झालं पण ती काही मला फार भावली नाहीत.
शाळेच्या पुस्तकांशिवाय
आमच्या घरी इतरही खूप पुस्तकं होती. रद्दी विकून जे काही पैसे येतील त्याची पुस्तकं
आणायची हे ठरलेलं . शिवाय भेट मिळालेली,
स्पर्धेची बक्षिसं म्हणून मिळालेली, काही बाबांच्या वेळची जुनी अशी सगळी पुस्तकं आम्ही
त्यांच्या उंची आणि जाडीप्रमाणे लाकडी स्टॅण्डवर लावून ठेवली होती. एक वर्ष सुट्टीत
त्यांना कव्हर्स घालायची टूम काढली. बाबांनी एकदम जाड ब्राऊन पेपर आणून दिला. इतका
मजबूत की आज ३५-४० वर्षांनंतरही त्यातली अनेक पुस्तकं व्यवस्थित कव्हर्ससहित माझ्या
कपाटात आहेत.
सोनियाच्या
निमित्ताने शाळेची ही खरेदी पुन्हा
एकदा अनुभवता आली. अजूनही मे
-जून मध्ये अप्पा बळवंत चौकात गेलं की वह्यांच्या स्टॉलला भेट देऊन चांगल्या
डझनभर वह्या घ्यायचा मला मोह होतो.
आता घरात खूप पुस्तकं
झाली आहेत. काही दिवस तरी
नवीन घायची नाहीत असं ठरवलं तरी
ऑफिसमध्ये पुस्तक प्रदर्शन लागलं की राहवत नाही.
नवीन पुस्तक घेऊन त्यावर नाव,
तारीख घालताना मला तितकाच आनंद
होतो.
मायक्रोसॉफ्ट
ऑफिस, स्मार्ट फोन असे सगळे
स्वीय सचिव हाताशी असूनही
माझी भिस्त अजूनही माझ्या वहीवरच आहे. रोजची कामं,
मीटिंग्सच्या नोट्स, वैयक्तिक महत्त्वाच्या नोंदी अशा सगळ्या माझ्या वेगवेगळ्या
वह्या आहेत. कधीतरी ड्रॉवर आवरताना जुन्या वह्या सापडतात. वाचताना मजा येते. त्या
फाडून मी परत दुसऱ्या
वह्या ठेवायला जागा करते. ह्या-पुस्तकांचं कपाट आवरायचा माझा
उद्योग बहुधा माझ्याबरोबरच थांबेल असं वाटतंय .…
p.c. Google
