" श्रीकृष्णार्पणमस्तु"
असं म्हणून लॅपटॉप कंपनीच्या इंजिनिअरकडे फॉरमॅटिंगसाठी सुपूर्त केला. एकदम शांतपणे. जराही
चलबिचल नाही. आदल्या रात्री हाच लॅपटॉप नीट
काम करत नव्हता तेव्हा
किती अस्वस्थ झाले होते मी.
लॅपटॉप चालू करण्यासाठी जे
काय उपाय करायला लागतात
ते सगळे केले आणि
जेव्हा तो चालू झाला
तेव्हा कुठे जीवात जीव
आला. गेली अनेक वर्षं
ज्याच्यात अक्षरश: जीव गुंतला होता
तोच हा लॅपटॉप. त्याच्यावरचा
अगणित डेटा,असंख्य मेल्स,
रिपोर्ट्स, प्रेसेंटेशन्स, फोटो आणि कित्येक
आठवणीसुद्धा. आता
फक्त आठवणी जवळ ठेवल्या. आवश्यक
तेवढा डेटा टीममध्ये वाटून
टाकला आणि उरलेला शांतपणे
'व्हर्चुअल' गंगेत सोडून दिला. किती हलकं वाटलं.
एखादं लहान मूल सतत
जवळ सांभाळत राहावं तसा हा लॅपटॉप
गेली २५ वर्षं नेहमी
खांद्यावर. कुठेही प्रवासाला जाताना हा बरोबरच. आता
एकदम 'सुटवंक ' वाटायला लागलं. संध्याकाळी बाहेर पडताना गळ्यातला कंपनीचा टॅग काढला. 'दुसरं
मंगळसूत्रं' असं आम्ही चेष्टेने
म्हणायचो. एकवार त्यातल्या माझ्या फोटोकडे पाहिलं आणि तोही सुपूर्त
करून बाहेर पडले.
आज विचार करताना आठवले असेच काही निरोपाचे
क्षण. काही कृतार्थ, काही
कृतज्ञ तर काही हळवे...
मला
आठवतंय, लहानपणी कोणी पाहुणे गावाहून
येणार असले की स्टेशनवर
आणायला जायला मी एका पायावर
तयार; पण हेच त्यांना
स्टेशनवर सोडायला जायची वेळ आली की
मी मागे. अगदी लहान असताना
माझी एक सख्खी मैत्रीण
तिच्या वडिलांची बदली झाली म्हणून
लांबच्या गावाला गेली. ती आणि तिची
आई रात्री निघताना आम्हांला सांगायला आल्या. उद्यापासून ती खेळायला नाही याचं मला
इतकं वाईट वाटत होतं
की मी तिच्याशी त्या
निरोपाच्या क्षणी नीट बोललेही नाही.
जसे
मोठे होत गेलो तसे
हे छोटे मोठे निरोपाचे
प्रसंग येत गेले. प्राथमिक
शाळेतून मोठ्या शाळेत जाताना किंवा दहावीतला शाळेतला निरोप समारंभ. आईची साडी नेसून
केलेलं भाषण,थोडंसं रडणं
आणि त्याबरोबर कॉलेजच्या नवलाईची उत्सुकता. शाळेतल्या शास्त्रीबाईंच्या अकाली निधनानंतर त्यांना शाळेच्या मैदानावर दिलेला अश्रुपूर्ण निरोप ...
माझं आता पर्यंतचं सगळं आयुष्य पुण्यातच गेलं. वडिलांचा वैद्यकीय व्यवसाय असल्याने बदलीचा प्रश्नच नव्हता. शिक्षण, लग्न सगळं पुण्यात. पुढे संजू मुंबई, दिल्ली असा कामासाठी राहिला तरी आम्ही घट्ट पुण्यात. त्यामुळे घराला, गावाला निरोप द्यायचे प्रसंग कमी आले. पण जे आले ते मात्र हळवे करणारे. नवीन मोठ्या घरात आलो तरी पूर्वीचे घर सोडताना फार जड गेलं. कित्येकदा संध्याकाळी त्या घराच्या आठवणींनी दाटून येत असे. एखाद्या घरात आपण थोडे दिवस जरी राहिलो तरी तिथे मन गुंतायला लागते. परत आठवणी जमायला लागतात आणि म्हणूनच मग जेव्हा यश ग्रीन्सबोरोचे घर सोडत होता किंवा सोनियाने घर बदललं तेव्हा बरेचदा मी व्हिडीओ कॉलवर ती घरं डोळे भरून पाहून घेतली. देश परदेशात कुठेही गेले तरी निघताना मी खूप मनापासून त्या गावचा, तिथल्या लोकांचा, तिथल्या निसर्गाचा निरोप घेते आणि “आपण पुन्हा नक्की भेटू या” असं मलाच समजावते. घरचे सगळे माझी चेष्टा करतात पण मी मधूनच सोनियाला विचारते, " जेफर्सन मेमोरियल काय म्हणतंय ? रॉसलिनला (म्हणजे तिथलं मेट्रो स्टेशन) माझा Hi सांग". आणि त्या ठिकाणांना परत भेटल्यावर मला खरंच खूप आनंद होतो.
पूर्वी घरी कोणी पाहुणे राहायला आले की त्यांना " तुम्ही किती दिवस राहणार आहात?" असं मी विचारत असे. हा कितीही 'पुणेरी आगाऊपणाचा' प्रश्न वाटला तरी माझ्या मनाच्या निरोपाच्या तयारीसाठीच तो असायचा. आता इतकं मोठं झाल्यावर मुलं जेव्हा काही आठवड्यांसाठी भारतात येतात तेव्हा आनंदानं त्यांचं स्वागत करताना,त्यांच्या आवडीचे पदार्थ करून खायला देताना, त्यांच्याबरोबर फिरताना ती निरोपाची तारीख मनात कुठेतरी भिरभिरत असते. आणि मग तो दिवस येतो. सकाळपासून उगीचच चिडचिड, मध्येच एकमेकांना उपदेशाचे सल्ले (म्हणजे लेक्चर), काही विसरलं नाहीयेना म्हणून उगीचंच बॅगेची उचकापाचक असं काही बाही चाललेलं असतं. निघताना ओवाळून हातावर दही देताना सगळं उसनं अवसान गळून पडतं. एअरपोर्टवर एकाचवेळी रडव्या आणि हसऱ्या चेहेऱ्याचा सेल्फी आणि अश्रूंचा बांध थोपवून एक घट्ट मिठी!! पूर्वी अगदी दारापाशी उभं रहायची परवानगी असायची. तेव्हा मग एकदा या काचेतून बघ , त्या काचेतून बघ असं करत चेक इन करून सिक्युरिटीला निघेपर्यंत bye करता यायचं. परत परत निरोप घ्यायचं वेडं समाधान!!
गणपती विसर्जनाच्या वेळेस पण अशीच हूरहूर आणि म्हणूनच मला वाटतं तीनदा गणपतीची मूर्ती पाण्यात बुडवून बाहेर काढायची आणि मग विसर्जन करायची पद्धत असावी. पहिल्या दिवशी मोदक करायचा उत्साह विसर्जनाच्या शिदोरीचे कानवले करताना पार मावळलेला असतो. गणपती घरी आल्यावर घंटा वाजवत सगळं घर फिरून दाखवल्यावर, निघताना मात्र घर दाखवणं एक उपचार उरतो. ताटात मूर्ती काढून ठेवल्यावर रिकामं मखर बघताना त्रास होतो. "पुनरागमनायचं " असं म्हणून बाप्पाला निरोप देताना माहित असतं की तो पुढच्या वर्षी नक्की येणार आहे. पण जेव्हा आपल्या जिवलगांना अखेरचा निरोप द्यायची वेळ येते तेव्हा शिकलेलं सगळं शहाणपण, वाचलेले सगळे सिद्धांत काही म्हणता काही आठवत नाही. “आता आपलं हे माणूस परत दिसणार नाही” एवढी एकच गोष्ट त्या क्षणी कळत असते आणि मग उरते फक्त ते तुटपुंजे क्षण साठवून ठेवण्याची पराकोटीची धडपड…
मग काही दिवस गेल्यावर थोडंसं भान येतं आणि जाणवतं की शारीर रूपात नसले तरी आपल्याजवळच आहेत ते. आठवणींतून, जीवनमूल्यांतून, संस्कारांमधून, कळत नकळत मिळणाऱ्या मार्गदर्शनातून त्यांच्याशी संवाद चालूच राहतो आणि होते मग त्या नात्याच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात.
खरं तर प्रत्येक निरोप हा कुठेतरी एका नवीन सुरुवातीशी जोडलेला असतो. नवीन सुरुवातीवरून आठवलं, सोनियाचं लग्न. लग्नाआधी चार वर्षं आमच्यापासून लांब असली, आता यशासारखा छान जोडीदार मिळाला असला, आमच्याइतकंच प्रेम करणारे अजून एक आई बाबा मिळाले असले तरी तिची पाठवणी करताना इतकं रडू आलं. कोणाच्याही लग्नात मंगलाष्टकाचे सूर जरी ऐकले तरी मला दाटून येतं. आमच्या ओळखीच्या एक आजी होत्या. त्या म्हणायच्या " मुलीची पाठवणी हा किती आनंदाचा क्षण आहे. तिच्या नव्या संसारासाठी तिला हसतमुखाने निरोप द्या". आजीचं म्हणणं कळतं पण वळत नाही.
एक वर्तुळ पूर्ण होऊन दुसरं सुरु
होत राहणार हाच तर सृष्टीचा
नियम आहे. आपण त्या
वर्तुळात कुठे उभं रहायचं
ते आपण ठरवायचं.
माझ्या
बाबांचं एक वाक्य कायम
माझ्या लक्षात राहिलं आहे. "आयुष्यात कुठे थांबायचं ते
कळलं पाहिजे ". कुठल्याही बाबतीत ते लागू होतं.
बोलताना, वागताना, नाती निभावताना, झोकून
देऊन काम करताना, अगदी
कुठल्याही बाबतीत.
आताशा
माझ्या लक्षात आलं की व्यावसायिक
जबाबदाऱ्यांतून मोकळं होऊन स्वतःसाठी, आपल्या
माणसांसाठी 'वेळ' काढायला हीच
योग्य 'वेळ' आहे. अतिशय
समाधानी,आनंदी कारकीर्द असतानाच तिचा 'निरोप' घेणं श्रेयस्कर. आणि
म्हणूनच गेले काही महिने
मी या 'निरोपाची' तयारी
करत होते. हा नुसताच कामाचा किंवा संस्थेचा निरोप नव्हता तर २५-30 वर्षांच्या
अनेकविध अनुभवांनी माझं जगणं सर्वार्थाने समृद्ध करणाऱ्या
कारकिर्दीचा,त्या
त्या काळात मिळालेल्या अधिकारांचा, हक्कांचा , सवलतींचा (privileges), त्या पदाचा (Role and Title), वेगवेगळ्या व्यासपीठावरील
नेतृत्वाचा, मान-सन्मानांच्या संधींचा
हा निरोप होता. काही दिवसांपूर्वी एक
ठिकाणी ओळख करून देताना
मी जाणीवपूर्वक माझ्या कामाचा, माझ्या पदाचा उल्लेख टाळला आणि फक्त 'वैशाली
' म्हणून माझी जी काय
ओळख आहे तीच सांगितली.
कुठेतरी एक छान निवृत्तीची,
‘समजूतदार विरक्तीची’ भावना झिरपत गेली होती आणि
म्हणूनच माझा निरोप समारंभ
मी अगदी मनापासून साजरा
केला.
असाच
एक मनस्वी निरोप मी काही वर्षांपूर्वी
माझ्या गर्भाशयाला आणि अंडाशयाला दिला.
पुरेसे उपचार करूनही जेव्हा उपयोग झाला नाही तेव्हा
complete hysterectomy करायचे
ठरले. शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी मी डोळे मिटून
शांतपणे ध्यान केलं. आजवरच्या माझ्या 'स्त्रीत्वाच्या प्रवासाच्या' वेगवेगळ्या टप्प्यावर या दोन अवयवांनी
जी मोलाची साथ दिली त्याबद्दल
मी त्यांचे मनापासून आभार मानले. दुसऱ्या
दिवशी कोणीतरी म्हणाले, "It won't
trouble you anymore. It’s a specimen now." मी
समजुतीने हसले. I knew it was much
more than ‘the specimen’!!
विचार करताना
वाटतं, आपला शेवट
कधी, कसा, कुठे होईल
माहित नाही पण जर
देवाने तो क्षण निवडायची
संधी दिली तर तो
कसा असेल?
१० वर्षांपूर्वी पहिल्यांदा युरोपला गेले होते. "Nice is Love" म्हणून तिथेच रमलेल्या माझ्या पुतणीबरोबर नीसचा अप्रतिम निळाशार समुदकिनारा, समुद्राच्या काठाने डोंगरवाटातून मोनॅको, मॉन्टेकार्लोला भेट, वाटेतली टुमदार गावं, वास्तुकलेचे सौंदर्य मिरवणाऱ्या इमारती आणि चर्चेस. पहिल्याच भेटीत मी युरोपच्या पार प्रेमात पडले आणि अजूनही त्याच प्रेमात आहे. नीसहून पॅरिसला जायचा दिवसभराचा ट्रेनचा प्रवास. सकाळी लवकर स्टेशनवर पोचलो. स्वच्छ सूर्यप्रकाश, हलकी थंडी, वाऱ्याच्या आल्हाददायक झुळका, सभोवती छान इमारती, त्यांच्या खिडक्यांबाहेरची सुंदर रंगीबेरंगी फुलझाडं, वातावरणात सकाळची मस्त ऊर्जा, हातात पॉल बेकरीतल्या कॉफीचा वाफाळता कप. आणि तितक्यात एक मुलगी स्टेशनच्या आवारात ठेवलेला पियानो वाजवायला येऊन बसली. त्या पियानोतून उमटणाऱ्या अद्भुत स्वरांनी अंगावर रोमांच उभे राहिले. डोळ्यांतून या जन्माबद्दलची कृतज्ञता, समाधान सगळंच पाझरायला लागलं. ‘ब्रह्मानंदी समाधी लागणं’ असं जे काय म्हणतात साधारण तसाच अनुभव आणि त्या क्षणी मी देवाला म्हटलं " रामराया, आत्ता, इथे, या क्षणी मला उचलून नेलंस तर मी यायला आनंदाने तयार आहे" आणि खरंच मी तृप्तीने डोळे मिटून घेतले. एका चांगल्या अर्थाने "आपुले मरण पहिले म्या डोळा" असा हा अनुभव प्रत्यक्षात उतरला आणि इतक्या सहजपणे, निर्मोहीपणे हसत हसत जगाचा निरोप घेता आला तर?
वैशाली फाटक
२० एप्रिल , २०२५