शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

माझ्या वरिष्ठ मार्गदर्शिका




 

जेव्हा जेव्हा  मी माझ्या  व्यावसायिक कारकिर्दीचा विचार करते तेव्हा दोन चेहेरे माझ्या डोळ्यासमोर येतात. तेजस्विनी कानविंदे आणि जयंती पाटील. त्या दोघींचा माझ्यावर, माझ्या कामावर फार प्रभाव आहे.

सोनियाचा जन्म  झाल्यावर मी जवळपास दोन वर्ष नोकरी करत नव्हते. एकदा सहज visiting faculty म्हणून सिंबायोसिस मध्ये CV दिला आणि लगेचच त्यांच्या टेलिकॉम मॅनेजमेंट ( SITM ) या नव्याने सुरु होणाऱ्या इन्स्टिटयूट साठी मला मुलाखतीचं बोलावणं आलं. मुलाखत छान झाली आणि लगेच रुजू   व्हायला सांगितलं . मी रुजू  झाले त्या दिवशी नेमकी SITM ची प्रवेश परीक्षा होती. पाहिलंच वर्ष.  त्यामुळे खूप गडबड होती. सगळे फ्रंट ऑफिसमध्ये कामात होते आणि तिथेच उभं राहून कानविंदे मॅडम, म्हणजे SICSR आणि SITM या दोन संस्थांच्या डायरेक्टर, सगळ्यांना मदत करत होत्या.   prospectus देत होत्या , मुलांशी , त्यांच्या पालकांशी बोलत होत्या.

गोरा वर्ण , सरळ नाक, पांढरी साडी आणि एकदम आपल्या आई -मावशी सारखं वाटावं असं व्यक्तिमत्त्व. मला त्या पाहताक्षणीच आवडल्या. काही क्षणातच तारा जुळाव्या असंच काहीसं झालं.

SITM नव्यानं सुरु झालं होतं. faculty मी एकटीच . बाकी सगळा SICSR चा स्टाफ आणि faculty आम्हाला मदत करायचे. कानविंदे मॅडम आय आय टी पास आऊट.  बरीच वर्ष दिल्लीला C -DOT मध्ये सॅम पित्रोदांच्या मार्गदर्शनाखाली काम केले होते . इंजिनीअरिंगच्या विषयांमध्ये तज्ञ. SITMचा अभ्यासक्रम तयार करताना , त्या क्षेत्रातील नामवंत लोकांना भेटून त्यांच्याकडून प्रत्येक विषयाचा आराखडा आखताना त्या इतकं छान मार्गदर्शन करत असत. गणित त्यांचा आवडता विषय. वार्षिक बजेट बनवताना किंवा कुठल्याही प्रकारचा हिशोब करताना कितीही मोठ्या रकमा असल्या तरी त्या पटापट तोंडी हिशोब करत. सगळ्या प्रवेश परीक्षांचे पेपर्सही त्या स्वतः सेट करत. त्यातले सगळे प्रश्न आधी सोडवून बघत.

विचारांमध्ये सुस्पष्टता . वागण्यात किंवा बोलण्यात कुठल्याही प्रकारची संदिग्धता नाही. नेमक्या शब्दात सूचना देणार. नवीन वर्षासाठी prospectus तयार करणं , जाहिरातीचा मजकूर ठरवणं कुठलंही काम त्या तितक्याच सहजपणे करत आणि सर्वांकडून करवून घेत. एकदम 'ट्रेंडी' असा  SITMचा  फॉंट आणि त्याचा विशिष्ट निळा रंग त्यांनीच निवडला होता.

एका वर्षात SITM  मॉडेल कॉलनीत हलले. नव्या ठिकाणचा ले-आऊट , फर्निचर सगळ्या बाबतीत त्यांनी बारकाईनं लक्ष घातलं . सर्व सोयी पाहिजेत पण मोकळी जागाही हवी . फर्निचरची दाटी नको. लायब्ररी मोठी , हवेशीर पाहिजे आणि हे सगळं बनवताना पैश्याची उधळपट्टी नको या सगळ्या बाबतीत त्या आग्रही होत्या .

SITM च्या त्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये आम्ही खूप नवनवीन गोष्टी सुरु केल्या, स्टाफ वाढला , SCIT ही नवीन इन्स्टिटयूट सुरु झाली . या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर मॅडमबरोबर काम  करताना खूप शिकायला मिळालं त्याचबरोबर खेळीमेळीने काम करण्यात आनंद आणि  काम छान  झाल्याचे समाधानही मिळाले.

कामाच्या बाबतीत जितक्या काटेकोर तितकीच  त्या आमची सगळ्यांची काळजी घ्यायच्या. सोनिया लहान असताना आजारी असली की सांगायच्या " आधी तुझ्या बाळाकडे बघ . कामाचं राहू दे ."
सोनिया आता मोठी झाली तरीही त्यांच्या आठवणीत ती बाळच आहे. पूर्वीच्याच  प्रेमाने तिची चौकशी करतात .

आता आमची भेट फोनवरूनच होते . आमचा दोघींचा वाढदिवस बरोबर एक आठवड्याच्या अंतराने येतो . मग त्या दिवशी हमखास फोन आणि गप्पा होतात. मी  नवीन काय करते हे जाणून घ्यायची त्यांना उत्सुकता असते .

कानविंदे मॅडम बरोबर मी जवळजवळ चार वर्ष काम केलं  आणि जयंती बरोबर दहा वर्ष . दोघींच्यात कमालीचं साम्य आहे. दोघीही एकदम साध्या. खूप शिकलेल्या, मोठ्या पदावर असूनही कुठलाही बडेजाव नाही . सतत नवीन वाचायची, शिकायची इच्छा , कामात चोख , दोघीही जितक्या प्रेमळ तितक्याच वेळ आली तर कठोर निर्णय घेण्यात मागेपुढे पाहणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठाम जीवनमूल्यं . तिथे कुठलीही तडजोड नाही.

मी एम आय टी असताना जयंती तिथेच प्रोफेसर होती, पण तेव्हा आमची फारशी ओळख नव्हती. पुढे मी MISEM जॉईन केलं , मग MBT , Tech M. या सगळ्या प्रवासात जयंतीकडून खूप शिकायला मिळालं .

खरं म्हणजे तिने समोर बसवून असं आम्हाला कधीच काही शिकवलं नाही. ती फक्त काय काम करायचं आहे ते सांगायची . कसं करायचं ते ज्याने त्याने आपापलं ठरवायचं . काही मदत लागली तर जयंती आहेच . एखादा मोठा प्रोजेक्ट असेल तर प्रत्येकाने आपापले मत मांडायचे . सर्वानुमते जे ठरेल ते फायनल . तिने तिची मतं कधी कोणावर लादली नाहीत . विचार करायचं , विचार मांडायचं आणि एखादी गोष्ट पटली नाही तर वाद घालायचं आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य होतं .

जयंती खरी गुणग्राहक . कोणती व्यक्ती कुठल्या कामासाठी योग्य आहे, तिचा/ त्याचा काय कल आहे हे ओळखून ती त्याप्रमाणे सगळ्यांना जबाबदारी द्यायची. लोकांना ठराविक 'रोल ' मध्ये बसवता तिने लोकांसाठी 'रोल 'तयार केले . कोणाच्याही उणीवांकडे लक्ष देण्या पेक्षा ती त्यांच्या strengths वर जास्त भरवसा ठेवत असे. एखाद्या चांगल्या टीम मेम्बरला दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये अजून चांगली संधी मिळत असेल तर त्याच्या वैयक्तिक प्रगतीसाठी ती त्यांना लगेच तिकडे ट्रान्सफरची परवानगी देत असे . IT क्षेत्रात हे बघायला मिळणं दुर्मिळच आहे .

जयंतीचा अजून एक महत्वाचा गुण म्हणजे सगळ्या लोकांना बरोबर घेऊन पुढे जायचं . तिच्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येकाला तिने पुढे जायची  संधी दिली . आमच्याकडून चुका झाल्या तर ती व्यवस्थित समजावून सांगत असे म्हणजे सहसा तशी चूक परत होत नसे . कुठल्याही कठीण प्रसंगात ती खंबीरपणे आमच्या पाठीशी उभी रहात असे.

कितीही आव्हानात्मक काम असो , आपण सगळे मिळून ते उत्तम प्रकारे करणारच असा तिचा ठाम विश्वास असे. ‘We can Do it !!!’ हा तिचा मूलमंत्र. जयंती बरोबर काम करायला मिळतंय म्हणून लोक अगदी स्वेच्छेने अशा मोठ्या प्रोजेक्ट्स मध्ये सामील होत असत . Job Family Framework, PCMMi असे कितीतरी मोठे प्रोजेक्ट्स तिने अत्यंत यशस्वीपणे राबवले आणि शेवटी एक  लीडर म्हणून कुठलंही श्रेय स्वतःकडे न घेता हे सगळं  केवळ चांगल्या टीममुळेच शक्य झालं असं म्हणून पुढच्या प्रोजेक्टसकडे वळली. A true Leader!!!

 याच काळात Tech M झपाट्याने मोठं होत गेलं.  मुंबई - पुण्याबरोबरच भारतात इतर सहा ठिकाणी ऑफिसेस  सुरु झाली . ट्रेनिंग टीम वाढत असतानाच जयंतीने processes, competency framework मजबूत करण्यावरही  तितकाच भर दिला.  कामात पूर्ण पारदर्शकता ( transparent work culture) हा तिचा अजून एक गुण . आमची वार्षिक appraisal ची विशिष्ठ पद्धत होती . फक्त गुणवत्ता आणि केलेलं काम एवढंच लक्षात घेतलं जायचं. सगळे टीम लीडर्स एकत्र बसून आणि बरेचदा तासनतास भांडून फायनल रेटिंग ठरवत असत . अजूनही आम्ही तसेच भांडतो.

अजून पुढे जाऊन ट्रेनिंग मध्ये काय बदल घडवायला पाहिजेत याची  संपूर्ण रूपरेखा तिच्याकडे तयार होती . त्या नुसार आमच्या कार्य पद्धतीत, आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये  आम्ही कायम बदल करत गेलो. आपले काम अधिकाधिक चांगले कसे करता येईल यावर ही भर असे. आमचा हा सगळा पाया पक्का झाल्याने ,आजही IT क्षेत्रात  वेगाने होणाऱ्या बदलांना सामोरे जाणे आम्हाला फारसे कठीण वाटत नाही.

असं म्हणतात की माणूस जितका उंचीवर जातो, तेवढा तो एकटा पडत जातो. लोकांपासून दूर जातो. जयंतीच्या बाबतीत हे अजिबातच लागू होत नाही.  लोकांना निरपेक्षपणे , मनापासून मदत करणं हा जयंतीचा स्थायीभाव आहे. जयंतीचे ऑफिस म्हणजे मुक्तद्वारच होते. विश्वासाने लोक त्यांचं मन मोकळं करत. अतिशय शांतपणे ती दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेत असे  , कधी कधी अशा प्रसंगात ती स्वतः कशी वागली ते सहज सांगत असे . कुणीतरी आपलं ऐकतंय हे सुद्धा लोकांना त्यांच्या  प्रश्नातून बाहेर पडण्यासाठी पुरेसं असे. प्रत्येक जण तिच्या केबिन मधून बाहेर पडताना एक positivity घेऊन बाहेर पडत  असे . मेंटॉर , कोच असं कोणतं बिरुद न मिरवता, लोकांचे प्रश्न त्यांना  स्वतःच सोडवायला मदत करण्याची जयंतीची एक खास शैली होती. ‘लोकांच्या ओझ्याने पाठ दुखेल’ असं म्हणून काही जण तिची चेष्टा करत पण तिला फरक पडत नसे . कोणाचं तरी भलं होतंय ना मग ठीक आहे असं म्हणून ती सगळं हसून सोडून देत असे .

आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की फार कमी स्त्रिया वरिष्ठ पातळीवर काम करतात . आणि ज्या काही तिथे पोचतात त्यातल्या बऱ्याचशा कदाचित कायम पुरुष सहकाऱ्यांबरोबर राहिल्याने त्याच प्रकारे वागू लागतात . ठामपणा आक्रमकतेकडे झुकू लागतो . बोलण्या वागण्यातील ऋजुता  कमी होते पण जयंतीच्या बाबतीत हे कधीच अनुभवाला आले नाही . या उलट एक स्त्री म्हणून असणारी दुसऱ्याबद्दलची  ‘Empathy’ हा तिचा मला भावलेला फार मोठा गुण आहे.

Tech M च्या सामाजिक उपक्रमांमध्ये ही तिचा सक्रिय सहभाग असायचा . वेगवेगळ्या संस्थांची माहिती मिळवणं , त्यांना कुठल्याप्रकरची मदत पाहिजे आहे ते बघून त्याप्रमाणे अहवाल बनवून त्यांना मदत मिळवून देणं, सगळं ती अतिशय तळमळीने करत असे . पुढे Tech M Foundation स्थापन झाल्यावर तिने तितक्याच सहजपणे सगळी जबाबदारी त्यांच्या सुपूर्त केली  .

जयंती वेळेच्या बाबतीत काटेकोर. तिची ऑफिसला यायची वेळ नक्की असे. आमच्या सगळ्यांच्या आधी येऊन सगळ्यांत शेवटी ती घरी जात असे. कुठलंही काम करताना ती जीव ओतून करणार. पाट्या टाकणं किंवा नाव मिळवण्यासाठी , प्रसिद्धीसाठी काही करणं हा तिचा पिंडच नाही . मागे मी म्हटलं तसं अगदी ठाम जीवनमूल्ये . एकदा तिला स्वतःला खूप छान संधी आली होती पण ‘आपण ती संधी घेतली तर दुसऱ्या कोणाची तरी नोकरी जाऊ शकते ज्याला नोकरीची नितांत गरज आहे’ , म्हणून तिने ती संधी नाकारली आणि काही जणांचा रोषही ओढवून घेतला. 

तशी ती Super Woman किंवा 'अष्टभूजा’ च म्हटली पाहिजे. सासर -माहेरचा खूप गोतावळा . जयंतीचं घर सगळ्यांच्या हक्काचं . कोणाचं आजारपण , कोणी हॉस्पिटलमध्ये , कोणाकडे लग्न. निमित्त काहीही असो . सगळ्यांचा मुक्काम जयंतीकडे . आणि जयंतीपण सगळ्यांचं फार प्रेमाने , धावून धावून करत असते .

तिच्या हातचे  मराठवाड्यातले पदार्थ आम्हाला फार आवडतात . आम्ही फक्त सांगायचा अवकाश की ती अंबाडीची भाजी , ठेचा , भाकरी , उडदाच्या डाळीची आमटी ,गुळाच्या पोळ्या असं आमच्यासाठी खास बनवून आणायची .

कानविंदे मॅडम किंवा जयंती . एखाद्या मोठ्या कुटुंबासारखं त्यांनी सगळ्या टीमला एकत्र बांधून ठेवलं . कुटुंब म्हटलं की गैरसमज , लहानसहान वादावादी होणारच . पण ते तिथल्या तिथे मिटवून पुन्हा आम्ही एकत्र . राजकारण,कुचाळक्या , एकमेकांचे पाय ओढणं अशा कुठल्याही गोष्टींना थारा नव्हता आणि त्यांच्या या शिकवणुकीनं आम्ही सगळे आजही तितक्याच एकोप्यानं , गुण्यागोविंदाने काम करतोय . आणि हो,जयंतीच्या कुटुंबाच्या व्याख्येत आमचे कुटुंबीय पण येतात . घरातल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला दर वर्षी पहिला मेसेज जयंतीचाच असतो.

 तिच्याबरोबर काम थांबवून आता काही वर्ष झाली. आता आम्ही वरचेवर भेटत नाही  पण अजूनही पक्की खात्री आहे की कधीही कामात काही अडलं किंवा अर्ध्या रात्री कसलीही मदत लागली तर जयंती आहेच.

या लेखाच्या निमित्ताने खूप जुन्या आठवणींना उजाळा मिळाला . SITM, MBT, Tech M चे जुने दिवस आठवले. एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतंय. आता फोन वर गप्पा न मारता त्यांना भेटायलाच हवं. तो पर्यंत कानविंदे मॅडम आणि जयंतीला नवरात्रीच्या खूप शुभेच्छा !!

 

वैशाली फाटक

सप्टेम्बर २४,२०१७

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

माझ्या गुरु




शाळेच्या संस्कारक्षम वयात , बालवाडीपासून ते दहावीपर्यंत अनेक शिक्षिकांचे प्रेम आणि मार्गदर्शन लाभले. खरंतर माझ्या घडण्यात 'रेणुका स्वरूप ' शाळेचा फार मोठा वाटा आहे . 'संपूर्ण व्यक्तिमत्व विकास ' असं काहीही म्हणता आयुष्यभर पुरेल इतकी शिदोरी तिथे मिळाली . तिथल्या माझ्या मार्गदर्शक तारा बापट बद्दल बाईं मी मागेच लिहिले आहे .

आज मी लिहिणार आहे माझ्या  गायनाच्या गुरु डॉ. शोभा अभ्यंकर यांच्याबद्दल .

शोभाताईंना पहिल्यांदा मी माझ्या शाळेतच पहिले. कुठल्यातरी गाण्याच्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आल्या होत्या . गुलाबी गोरेपण , शिडशिडीत बांधा ,एक  वेणी , नाकात चमकणारा हिरा आणि डोळ्यात एक मिश्किल हसू असलेली प्रसन्न भावमुद्रा . नंतर त्यांना बघितलं ते सवाई गंधर्वमध्ये . त्यावेळचा युवा गायक संजीव अभ्यंकरची आई म्हणून . संजीवचे रंगत जाणारे,त्याच्या गायनातल्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही देणारे ते गाणे , रसिकांची उस्फूर्त दाद आणि टाळ्यांचा कडकडाट. आपल्या मुलाचं ते गाणं ऐकताना त्या माऊलीच्या डोळ्यातलं कौतुक आणि अभिमानाने फुललेला चेहेरा मला अजूनही आठवतोय .

त्यांचा मुलगा सचिन आणि माझा भाऊ अमित कॉलेज मधले मित्र . मध्ये काही वर्ष माझा  गाणं शिकण्यात खंड पडला होता . परत सुरु करायचं ठरवलं तेव्हा सचिनची आई म्हणून शोभाताईंना जाऊन भेटले आणि  त्यांच्याकडे माझं गाणं सुरु झालं .

आधीची वर्ष मी जास्त करून उपशास्त्रीय गाणं शिकल्याने पहिल्यांदाच इतक्या पद्धतशीरपणे शास्त्रीय गायन शिकायला मिळाले . आवाज लावणं , मेवाती घराण्याच्या पद्धतीनुसार ' ओम श्री अनंत हरी नारायण ' म्हणून रागाला सुरुवात करणं ,विलंबित लयीतले ख्याल गायन ,आरोहातल्या एकेक स्वराला बढत देऊन करायचा रागविस्तार , ख्याल झाला की द्रुत लयीतली बंदिश , ताना , बोलताना , कधी तराणा . शोभाताई प्रत्येक गोष्ट सोपी करून , समजावून सांगायच्या आणि मग गाऊन दाखवायच्या . त्यांची प्रतिभा विलक्षण . कधी मनासारखी बंदिश मिळाली नाही तर स्वतःही बंदिश रचत  असत. रागाचे स्वर तेच पण वेगवेगळ्या प्रकारे त्याची मांडणी, कॉम्बिनेशन्स करत गाणं कसं खुलवायचं हे सप्रयोग दाखवत असत .

आम्ही चार-पाच जणी एकत्र शिकायचो. तरी  प्रत्येकीच्या आवाजावर त्यांचे बारीक लक्ष असे. एखादीचा स्वर कमी जास्त लागला की लगेच तिला परत गायला सांगायच्या . आधी एकत्र आलापी , मग स्वतंत्र गाऊन दाखवायचे . कोणी तालाला पक्के तर कोणाच्या सफाईदार ताना . एकमेकींचं गाणं ऐकताना आणि प्रत्येकीला शोभाताईंनी दिलेल्या विशेष सूचना ऐकून आमचे गाणेही सुधारत असे.

मे महिन्याच्या सुट्टीत नेहमीच्या बॅचेस नसत तर सकाळी सात ते नऊ सगळ्यांचा  एकत्रित रियाज असे.  सकाळच्या वेळीअहिर भैरव’ च्या मंगल सुरांनी 'सुशील ' बंगला अक्षरशः भारून  जात असे .

गाणं शिकायला येणाऱ्या प्रत्येकीवर त्यांची माया. मीनल लोणावळ्याहून शिकायला यायची म्हणून तिला गरम दूध . एकजण स्वभावाने अतिशय गरीब होती . खाष्ट सासूपुढे तिचं काही चालत नसे. आपणही काही करू शकतो हा आत्मविश्वास तिला शोभाताईंनी मिळवून दिला.

 शोभाताई स्वतः Biochemistry च्या मास्टर्स आणि संगीतामध्येही प्रथम क्रमांकाने एम .ए.  सुरवातीला पं.  गंगाधरबुवा पिंपळखरे, पं.  वि. रा. आठवले आणि पुढे पं. जसराजजींच्या कडून त्या मेवाती घराण्याची गायकी शिकल्या .
शास्त्र आणि कला दोन्हीतही त्या अव्वलच होत्या . शोभाताईंनी आम्हाला सगळ्यांना गाणं तर शिकवलंच पण त्याचबरोबर ज्याला आपण ‘Life Skills’ म्हणतो , त्याची त्या स्वतःच एक चालती बोलती शाळा होत्या . She was an institution by herself.

आजच्या भाषेत त्यांनी आमचं 'ग्रूमिंग' केलं असंच म्हणता येईल. स्टेजवर गायला बसताना साडी कशी नेसायची,तंबोरा धरून बसताना साडी पायाच्या अंगठ्याखाली का धरायची , मेकअप कसा आणि किती करायचा असं सगळं त्या समजावून सांगत . प्रत्येक प्रकारच्या कार्यक्रमासाठी त्यांच्याकडे त्या त्या प्रसंगाला साजेशा साड्या असत . उच्च अभिरुची , साड्यांची चोखंदळ निवड , हिऱ्याचे किंवा मोत्यांचे मोजकेच दागिने. She was Gorgeous and Graceful..always graceful…!!!

प्रचंड आत्मविश्वास पण आत्मप्रौढी अजिबात नाही . वक्तशीर , व्यवस्थित आणि  शिस्तीच्या.  गबाळेपणा त्यांना अजिबात चालत नसे. गाणं शिकवताना पण एकदम ताठ बसायच्या. प्रत्येक गोष्टीचं प्लँनिंगही नेमकं असे.  घरातल्या वाण सामानापासून ते गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमापर्यंत . त्यामुळे आयत्यावेळी गडबड , पळापळ असं काही नाही . अफाट ऊर्जा . कंटाळा , थकवा हे शब्द त्यांच्या शब्दकोशातच नव्हते . एका पाठोपाठ एक बॅचेस असत . पण प्रत्येक बॅचमध्ये तीच एनर्जी , तोच उत्साह , अखंड बोटावर ताल देऊन शिकवणं . Hats off to her dedication, involvement and commitment. शास्त्रीय संगीतात ' गुरु ' म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना 'राग  ऋषी ' आणि 'पं . विष्णु दिगंबर पलुस्कर ' पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

घरात सासू सासरे ,दीर नणंदा  आणि कायम पाहुण्यांचा राबता . त्या सगळ्यांचं अगदी व्यवस्थित करून त्या गाणं शिकवायला बसायच्या . सचिनची आजी आजारी असायची . त्यांचे बरेचदा सगळे करावे लागे. आजोबा काहीसे तापट. पण शोभाताईंनी आपल्या प्रेमाने आणि कर्तबगारीने सगळ्यांना जिंकून घेतले होते . त्यांना कामाचा अचाट उरक होता . घरात गौरी -गणपती असताना चारी ठाव नैवेद्याचा स्वयंपाक आठच्या आत आटपून त्या क्लास सुरु करत आणि क्लास संपल्यावर उकडीचे गरम मोदक वगैरे. 

माझ्या सासूबाईंना पॅरालीसीस झाल्याने त्या अंथरुणावर असत . मी तेव्हा शिकत होते. कॉलेज , अभ्यास , घरची जबाबदारी असं सगळं सांभाळताना मी कधीकधी गडबडून जात असे. अशावेळेस शोभाताई मला समजावत असत. " छान कर सगळ्यांचं . मोठ्या माणसांचे , आजारी माणसांचे आशीर्वाद फार मोलाचे असतात . कायम पाठीशी राहतात " असं म्हणून त्या मला धीर देत असत.

हातपाय गाळून बसलेलं , परिस्थितीपुढे हात टेकलेलं त्यांना अजिबात आवडत नसे . आपण पूर्ण प्रयत्न करायलाच पाहिजे मग जे घडेल ते घडेल हि त्यांची फिलॉसॉफी . अफाट जिद्द . आणि म्हणूनच त्या साठीनंतरही गाण्यात डॉक्टरेट होऊ शकल्या

 कदाचित ही जिद्द माझ्यात कमी पडली . नोकरीला लागल्यावर सगळ्या धबडग्यात माझं गाणं सुटलं . नंतर एक-दोन ठिकाणी शिकायचा प्रयत्न केला पण ते शिकवणं पटलं नाही . महिन्यात पाचवा आठवडा आला तर क्लासला सुट्टी हे गणित मला झेपलं  नाही. शोभाताईंनी माझ्या मनात गुरु बद्दलचा बेंचमार्क इतका जबरदस्त सेट केला आहे की त्याच्या आसपास पोचणारं अजून तरी कोणी मिळालं नाहीये . एकच आशा आहे की शोभाताईंची एखादी शिष्याच ही गादी पुढे चालवेल .

नवरात्रीच्या निमित्ताने या गान सरस्वतीला प्रणाम !!!

 वैशाली फाटक 

२३ सप्टेंबर, २०१७