रविवार, २० एप्रिल, २०२५

निरोप घेताना ...

 

" श्रीकृष्णार्पणमस्तु" असं म्हणून लॅपटॉप कंपनीच्या इंजिनिअरकडे फॉरमॅटिंगसाठी सुपूर्त केला. एकदम शांतपणे. जराही चलबिचल नाही. आदल्या रात्री हाच लॅपटॉप नीट काम करत नव्हता तेव्हा किती अस्वस्थ झाले होते मी. लॅपटॉप चालू करण्यासाठी जे काय उपाय करायला लागतात ते सगळे केले आणि जेव्हा तो चालू झाला तेव्हा कुठे जीवात जीव आला. गेली अनेक वर्षं ज्याच्यात अक्षरश: जीव गुंतला होता तोच हा लॅपटॉप. त्याच्यावरचा अगणित डेटा,असंख्य मेल्स, रिपोर्ट्स, प्रेसेंटेशन्स, फोटो आणि कित्येक आठवणीसुद्धा.  आता फक्त आठवणी जवळ ठेवल्या. आवश्यक तेवढा डेटा टीममध्ये वाटून टाकला आणि उरलेला शांतपणे 'व्हर्चुअल' गंगेत सोडून दिला. किती हलकं वाटलं. एखादं लहान मूल सतत जवळ सांभाळत राहावं तसा हा लॅपटॉप गेली २५ वर्षं नेहमी खांद्यावर. कुठेही प्रवासाला जाताना हा बरोबरच. आता एकदम 'सुटवंक ' वाटायला लागलं. संध्याकाळी बाहेर पडताना गळ्यातला कंपनीचा टॅग काढला. 'दुसरं मंगळसूत्रं' असं आम्ही चेष्टेने म्हणायचो. एकवार त्यातल्या माझ्या फोटोकडे पाहिलं आणि तोही सुपूर्त करून बाहेर पडले.

आज विचार करताना आठवले असेच काही निरोपाचे क्षण. काही कृतार्थ, काही कृतज्ञ तर काही हळवे...

 मला आठवतंय, लहानपणी कोणी पाहुणे गावाहून येणार असले की स्टेशनवर आणायला जायला मी एका पायावर तयार; पण हेच त्यांना स्टेशनवर सोडायला जायची वेळ आली की मी मागे. अगदी लहान असताना माझी एक सख्खी मैत्रीण तिच्या वडिलांची बदली झाली म्हणून लांबच्या गावाला गेली. ती आणि तिची आई रात्री निघताना आम्हांला सांगायला आल्या. उद्यापासून ती खेळायला नाही याचं मला इतकं वाईट वाटत होतं की मी तिच्याशी त्या निरोपाच्या क्षणी नीट बोललेही नाही. 

 जसे मोठे होत गेलो तसे हे छोटे मोठे निरोपाचे प्रसंग येत गेले. प्राथमिक शाळेतून मोठ्या शाळेत जाताना किंवा दहावीतला शाळेतला निरोप समारंभ. आईची साडी नेसून केलेलं भाषण,थोडंसं रडणं आणि त्याबरोबर कॉलेजच्या नवलाईची उत्सुकता. शाळेतल्या शास्त्रीबाईंच्या अकाली निधनानंतर त्यांना शाळेच्या मैदानावर दिलेला अश्रुपूर्ण निरोप ...

 माझं आता पर्यंतचं सगळं आयुष्य पुण्यातच गेलं. वडिलांचा वैद्यकीय व्यवसाय असल्याने बदलीचा प्रश्नच नव्हता. शिक्षण, लग्न सगळं पुण्यात. पुढे संजू मुंबई, दिल्ली असा कामासाठी राहिला तरी आम्ही घट्ट पुण्यात. त्यामुळे घराला, गावाला निरोप द्यायचे प्रसंग कमी आले. पण जे आले ते मात्र हळवे करणारे. नवीन मोठ्या घरात आलो तरी पूर्वीचे घर सोडताना फार जड गेलं.  कित्येकदा संध्याकाळी त्या घराच्या आठवणींनी दाटून येत असे. एखाद्या घरात आपण थोडे दिवस जरी राहिलो तरी तिथे मन गुंतायला लागते. परत आठवणी जमायला लागतात आणि म्हणूनच मग जेव्हा यश ग्रीन्सबोरोचे  घर सोडत होता किंवा सोनियाने घर बदललं तेव्हा बरेचदा मी व्हिडीओ कॉलवर ती घरं डोळे भरून पाहून घेतली. देश परदेशात कुठेही गेले तरी निघताना मी खूप मनापासून त्या गावचा, तिथल्या लोकांचा, तिथल्या निसर्गाचा निरोप घेते आणिआपण पुन्हा नक्की भेटू या” असं मलाच समजावते. घरचे सगळे माझी चेष्टा करतात पण मी मधूनच सोनियाला विचारते, " जेफर्सन मेमोरियल काय म्हणतंय ? रॉसलिनला (म्हणजे तिथलं मेट्रो स्टेशन) माझा Hi सांग". आणि त्या ठिकाणांना परत भेटल्यावर मला खरंच खूप आनंद होतो.  

पूर्वी घरी कोणी पाहुणे राहायला आले की त्यांना " तुम्ही किती दिवस राहणार आहात?" असं मी विचारत असे. हा कितीही 'पुणेरी आगाऊपणाचा' प्रश्न वाटला तरी माझ्या मनाच्या निरोपाच्या तयारीसाठीच तो असायचा. आता इतकं मोठं झाल्यावर मुलं  जेव्हा काही आठवड्यांसाठी भारतात येतात तेव्हा आनंदानं त्यांचं स्वागत करताना,त्यांच्या आवडीचे पदार्थ करून खायला देताना, त्यांच्याबरोबर फिरताना ती निरोपाची तारीख मनात कुठेतरी भिरभिरत असते. आणि मग तो दिवस येतो. सकाळपासून उगीचच चिडचिड, मध्येच एकमेकांना उपदेशाचे सल्ले (म्हणजे लेक्चर), काही विसरलं नाहीयेना म्हणून उगीचंच बॅगेची उचकापाचक असं काही बाही चाललेलं असतंनिघताना ओवाळून हातावर दही देताना सगळं उसनं अवसान गळून पडतं. एअरपोर्टवर एकाचवेळी रडव्या आणि हसऱ्या चेहेऱ्याचा सेल्फी आणि अश्रूंचा बांध थोपवून एक घट्ट मिठी!! पूर्वी अगदी दारापाशी उभं रहायची परवानगी असायची. तेव्हा मग एकदा या काचेतून बघ , त्या काचेतून बघ असं करत चेक इन करून सिक्युरिटीला निघेपर्यंत bye करता यायचं. परत परत निरोप घ्यायचं वेडं समाधान!!

 गणपती विसर्जनाच्या वेळेस पण अशीच हूरहूर आणि म्हणूनच मला वाटतं तीनदा गणपतीची मूर्ती पाण्यात बुडवून बाहेर काढायची आणि मग विसर्जन करायची पद्धत असावी. पहिल्या दिवशी मोदक करायचा उत्साह विसर्जनाच्या शिदोरीचे कानवले करताना पार मावळलेला असतो. गणपती घरी आल्यावर घंटा वाजवत सगळं घर फिरून दाखवल्यावर, निघताना मात्र घर दाखवणं एक उपचार उरतो. ताटात मूर्ती काढून ठेवल्यावर रिकामं मखर बघताना त्रास होतो. "पुनरागमनायचं " असं म्हणून बाप्पाला निरोप देताना माहित असतं की तो पुढच्या वर्षी नक्की येणार आहे. पण जेव्हा आपल्या जिवलगांना अखेरचा निरोप द्यायची वेळ येते तेव्हा शिकलेलं सगळं शहाणपण, वाचलेले सगळे सिद्धांत काही म्हणता काही आठवत नाही. “आता आपलं हे माणूस परत दिसणार नाही” एवढी एकच गोष्ट त्या क्षणी कळत असते आणि मग उरते फक्त ते तुटपुंजे क्षण साठवून ठेवण्याची पराकोटीची धडपड

मग काही दिवस गेल्यावर थोडंसं भान येतं आणि जाणवतं की शारीर रूपात नसले तरी आपल्याजवळच आहेत ते. आठवणींतून, जीवनमूल्यांतून, संस्कारांमधून, कळत नकळत मिळणाऱ्या मार्गदर्शनातून त्यांच्याशी संवाद चालूच राहतो आणि होते मग त्या नात्याच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात. 

खरं तर प्रत्येक निरोप हा कुठेतरी एका नवीन सुरुवातीशी जोडलेला असतो. नवीन सुरुवातीवरून आठवलं, सोनियाचं लग्न. लग्नाआधी चार वर्षं आमच्यापासून लांब असली, आता यशासारखा छान जोडीदार मिळाला असला, आमच्याइतकंच प्रेम करणारे अजून एक आई बाबा मिळाले असले तरी तिची पाठवणी करताना इतकं रडू आलं. कोणाच्याही लग्नात मंगलाष्टकाचे सूर जरी ऐकले तरी मला दाटून येतं. आमच्या ओळखीच्या एक आजी होत्या. त्या म्हणायच्या " मुलीची पाठवणी हा किती आनंदाचा क्षण आहे. तिच्या नव्या संसारासाठी तिला हसतमुखाने निरोप द्या". आजीचं म्हणणं कळतं पण वळत नाही.   

एक वर्तुळ पूर्ण होऊन दुसरं सुरु होत राहणार हाच तर सृष्टीचा नियम आहे. आपण त्या वर्तुळात कुठे उभं रहायचं ते आपण ठरवायचं.

माझ्या बाबांचं एक वाक्य कायम माझ्या लक्षात राहिलं आहे. "आयुष्यात कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे ". कुठल्याही बाबतीत ते लागू होतं. बोलताना, वागताना, नाती निभावताना, झोकून देऊन काम करताना, अगदी कुठल्याही  बाबतीत.

आताशा माझ्या लक्षात आलं की व्यावसायिक जबाबदाऱ्यांतून मोकळं होऊन स्वतःसाठी, आपल्या माणसांसाठी 'वेळ' काढायला हीच योग्य 'वेळ' आहे. अतिशय समाधानी,आनंदी कारकीर्द असतानाच तिचा 'निरोप' घेणं श्रेयस्कर. आणि म्हणूनच गेले काही महिने मी या 'निरोपाची' तयारी करत होते. हा नुसताच कामाचा किंवा संस्थेचा निरोप नव्हता तर २५-30 वर्षांच्या अनेकविध अनुभवांनी माझं जगणं सर्वार्थाने समृद्ध करणाऱ्या कारकिर्दीचा,त्या त्या काळात मिळालेल्या अधिकारांचा, हक्कांचा , सवलतींचा (privileges), त्या पदाचा (Role and Title), वेगवेगळ्या व्यासपीठावरील नेतृत्वाचा, मान-सन्मानांच्या संधींचा हा निरोप होता. काही दिवसांपूर्वी एक ठिकाणी ओळख करून देताना मी जाणीवपूर्वक माझ्या कामाचा, माझ्या पदाचा उल्लेख टाळला आणि फक्त 'वैशाली ' म्हणून माझी जी काय ओळख आहे तीच सांगितली. कुठेतरी एक छान निवृत्तीची, ‘समजूतदार विरक्तीची’ भावना झिरपत गेली होती आणि म्हणूनच माझा निरोप समारंभ मी अगदी मनापासून साजरा केला.

असाच एक मनस्वी निरोप मी काही वर्षांपूर्वी माझ्या गर्भाशयाला आणि अंडाशयाला दिला. पुरेसे उपचार करूनही जेव्हा उपयोग झाला नाही तेव्हा complete hysterectomy करायचे ठरले. शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी मी डोळे मिटून शांतपणे ध्यान केलं. आजवरच्या माझ्या 'स्त्रीत्वाच्या प्रवासाच्या' वेगवेगळ्या टप्प्यावर या दोन अवयवांनी जी मोलाची साथ दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानले. दुसऱ्या दिवशी कोणीतरी म्हणाले, "It won't trouble you anymore. It’s a specimen now." मी समजुतीने हसले. I knew it was much more than ‘the specimen’!!

विचार करताना वाटतं, आपला शेवट कधी, कसा, कुठे होईल माहित नाही पण जर देवाने तो क्षण निवडायची संधी दिली तर तो कसा असेल?

१० वर्षांपूर्वी पहिल्यांदा युरोपला गेले होते. "Nice is Love" म्हणून तिथेच रमलेल्या माझ्या पुतणीबरोबर नीसचा अप्रतिम निळाशार समुदकिनारा, समुद्राच्या काठाने डोंगरवाटातून  मोनॅको, मॉन्टेकार्लोला भेट, वाटेतली टुमदार गावं, वास्तुकलेचे सौंदर्य मिरवणाऱ्या इमारती आणि चर्चेस. पहिल्याच भेटीत मी युरोपच्या पार प्रेमात पडले आणि अजूनही त्याच प्रेमात आहे.  नीसहून पॅरिसला जायचा दिवसभराचा ट्रेनचा प्रवास. सकाळी लवकर स्टेशनवर पोचलो.  स्वच्छ सूर्यप्रकाश, हलकी थंडी, वाऱ्याच्या आल्हाददायक झुळका, सभोवती छान इमारती, त्यांच्या खिडक्यांबाहेरची सुंदर रंगीबेरंगी फुलझाडं, वातावरणात सकाळची मस्त ऊर्जा, हातात पॉल बेकरीतल्या कॉफीचा वाफाळता कप. आणि तितक्यात एक मुलगी स्टेशनच्या आवारात ठेवलेला पियानो वाजवायला येऊन बसली. त्या पियानोतून उमटणाऱ्या अद्भुत स्वरांनी अंगावर रोमांच उभे राहिले. डोळ्यांतून या जन्माबद्दलची कृतज्ञता, समाधान सगळंच पाझरायला लागलं. ‘ब्रह्मानंदी समाधी लागणं’ असं जे काय म्हणतात साधारण तसाच अनुभव आणि त्या क्षणी मी देवाला म्हटलं " रामराया, आत्ता, इथे, या क्षणी मला उचलून नेलंस तर मी यायला आनंदाने तयार आहे" आणि खरंच मी तृप्तीने डोळे मिटून घेतले. एका चांगल्या अर्थाने "आपुले मरण पहिले म्या डोळा" असा हा अनुभव प्रत्यक्षात उतरला आणि इतक्या सहजपणे, निर्मोहीपणे हसत हसत जगाचा निरोप घेता आला तर? 


वैशाली फाटक 

२० एप्रिल , २०२५    

     

 

गुरुवार, २८ मार्च, २०२४

अमलताश



 लहानपणी वाचलेली जादूची गोष्ट. एक सुंदर राजकन्या. रूपवान, गुणवान पण कसला तरी जिवघेणा शाप. पांढऱ्या घोड्यावरून आलेला एक शूर राजपुत्र तिच्या प्रेमात पडतो, तिच्याशीच लग्न करायचा हट्ट धरून बसतो आणि मग ते लग्न करून सुखी होतात वगैरे…!


जादूच्या गोष्टी वाचताना मन नकळत कल्पनाविलासात दंग व्हायचं. वाचलेल्या शब्दांचं डोळ्यासमोर एक सुंदर चित्र उभं रहायचं. 
परवा एक अशीच सुंदर जादूची गोष्ट बघितली- ‘अमलताश’
पुस्तकातल्या गोष्टीसारखी सरळ धोपट सांगितलेली नाही पण अनेक छोट्या छोट्या प्रसंगांची आगळीच गुंफण. एखादं jigsaw puzzle लावताना कसे आपण तुकडे जोडत जातो किंवा एखादं कोलाज बनवताना जसा feel येतो तशीच काहीशी गोष्ट पुढे सरकत जाते. हळूहळू उलगडत जाते. 

तुमच्या आमच्या सारखीच, आसपास असतात तशी सगळी पात्रं. त्यांचं वागणं-बोलणं, एकमेकांची काळजी घेणं, टाइमपास करणं, ‘पुणेरी’ पध्दतीने एकमेकांची खेचत राहणं सगळं आपल्या आजूबाजूलाच घडतंय असं वाटतं. त्याला तडका म्हणजे कॅनडाहून आलेल्या पल्लवीचा जबरदस्त accent आणि ‘एक विचारू का ?’ हा प्रश्न !!
जसं ‘कहानी’मध्ये कोलकता महत्त्वाची भूमिका पार पाडतं तसंच ‘अमलताश’मध्ये पुणं सतत भेटत रहातं. वेताळ टेकडीवर, पौडफाट्याच्या फ्लायओवरवर, नदीपात्रात, कॅनालरोडच्या वॅाकवे वर, दुचाकी पुलावर, पेठेतल्या दुकानात, वाड्यातल्या घराच्या गच्चीवर…आणि सिनेमॅटोग्राफरची कमाल म्हणजे पुणं इतकं सुंदर दिसतं नां!!!

अमलताशचं संगीत अफलातून. ‘Absolute Pitch’ची दैवी देणगी लाभलेला राहूल,  unplugged style अप्रतिम compositions, पल्लवी परांजपेचा वेगळाच पोत असलेला आवाज, ऐकत रहावी अशी दीप्ती माटेनी गायलेली लोरी, jamming session आणि चोख साथीदार पियानो आणि गिटार. संपूर्ण चित्रपटावर या संगीताचं गारूड रहातं. 

अमलताश म्हणजेच बहावा. पहिल्यांदा वि.द. घाट्यांच्या ‘कॅशिया भरारला’ मध्ये शाळेत असताना भेटलेला आणि आता नशीबाने दर उन्हाळ्यात भेटत राहणारा. कारण माझ्या घरासमोरच्या रस्त्यावर ओळीने बहाव्याची झाडं आहेत. जानेवारी फेब्रुवारीमध्ये निष्पर्ण, निष्प्राण दिसणारी झाडं. सगळीकडे जोरदार पानगळ होत असते. बहुतेक झाडांच्या नुसत्याच काड्या राहिलेल्या. आणि अचानक एखाद-दुसरी काडी हिरवी व्हायला लागते. कुठे कुठे हिरवे शेंडे दिसायला लागतात. मग एखादा छोटासा पिवळ्या फुलांचा झुबका. आणि पाहता पाहता काही दिवसांत सगळी बहाव्याची रांगच पिवळ्याघोसांनी बहरून जाते. उन्हाळ्यामुळे तगमग होत असली तरी बाहेर बघता क्षणीच प्रसन्न वाटतं. A great feeling of abundance and joy of life…

वर्षातल्या अवघ्या काही आठवड्यांचा हा बहर. पुढे येणाऱ्या पावसाची वर्दी देणारा. हा बहर येतोच तो समृध्दीची, पूर्णत्वाची भावना घेऊन. ‘जिंदगी लंबी नहीं पर बडी होनी चाहिए’ चा दाखला देत फुलत रहातो. 
राहूल पल्लवीची उण्यापुऱ्या एक महिन्याची ओळख, दोघांची समांतर आयुष्यं आणि तरीही नकळत एकमेकांत गुंतत जाणं, फुलत जाणं… त्यांच्या आयुष्यातल्या ‘अमलताश’चा अर्थ प्रत्येकाने आपापल्यापरीने लावावा. एखादं चित्रं बघताना, मैफल ऐकताना जसं एक   Abstract feeling असतं तसंच काहीसं ‘अमलताश’ बघताना जाणवत रहातं. आणि म्हणूनच प्रत्येकाला तो वेगवेगळा समजतो, भावतो.
थोडासा चाकेरी बाहेरचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा नक्कीच पहावा असा ‘अमलताश’ 

©️वैशाली फाटक


सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

सुदाम्याचे पोहे

      " ईशाची मम्मा ना खूप छान  आहे दिसायलाआणि तिचे ड्रेस पण खूप छान असतात. पण अगं ती ना मम्मा नाही वाटत !".  सोनिया लहान असताना तिच्या पाळणाघरात एक नवीन मुलगी आली  होती. तिची आई रोज तिला सोडायला यायची आणि थोडावेळ थांबून मग जायची. सोनियाचं निरीक्षण फार. मला वाटलं असेल एखादी ' संतूर गर्ल'. पण सोनियाला वेगळंच काहीतरी जाणवत होतं आणि तिला नक्की काय वाटतंय ते मला कळत नव्हतं. आज एकदम ह्या प्रसंगाची आठवण झाली गौरीच्या मुखवट्यांचे फोटो बघून.  

या वर्षी घरचा गणपती करून निघाले. गौरीला पुण्यात नसल्याने सगळे अपडेट्स फोनवरच. गौरी गणपतीचे दिवस  आले की  वातावरणातच कसा उत्साह येतो. गणपतीचे स्टॉल लागायला लागतात आणि मग माझी एक हमखास चक्कर तुळशीबागेत होते. गौरीचे मुखवटे, स्टॅन्ड , साड्या , दागिने,सजावटीचं साहित्य यांनी तुळशीबाग गजबजून जाते. कुणाकडे खडयाच्या गौरी, कुणाकडे पितळ्याचे  किंवा चांदीचे मुखवटे. कुणाकडे तांब्या-भांड्यावर हळदी कुंकवाने रंगवलेल्या गौरी तर बरेच ठिकाणी शाडूचे मुखवटे. आमच्या घरी उभ्याच्या गौरी नसल्या तरी लहानपणी खळदकर मावशीकडे मी हक्काने तीन दिवस गौरी  आणायला,बसवायला, हळदीकुंकू द्यायला जात असे. लग्न झाल्यापासून आनंदिनी आणि अश्विनीकडच्या  गौरींचे दर्शन मी सहसा चुकवत नाही. गौरीच्या चेहेऱ्यावरचा प्रसन्न भाव आणि पूजेनंतर जे तेज येतं ते बघून मला एक वेगळीच ऊर्जा मिळते.

परवा एका मुखवट्याचा फोटो व्हॉट्स ऍप वर आला. अतिशय सुंदर मुखवटा. सुबक चेहेरा. आधुनिक केशरचना, कानावर बटा, कोरीव भुवया,डोळे-पापण्या -गालावर आजच्या पद्धतीचा मेकअप, कानात झुमके , गळ्यात नव्या जुन्या प्रकारचे दागिने. मुखवटा सुंदर होता यात शंकाच नाही पण त्यात मला काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. काही तरी कमी वाटत होतं, राहून गेल्यासारखं.  गौरीच्या साध्याशा मुखवट्यातला सात्विक शालीन भाव, मांगल्य, समाधान, तृप्ती कुठेतरी या नवीन मुखवट्यात मी शोधू पाहत होते.



मला एकदम आपली आधीची पिढी आठवली. आपली आई, आजी, काकू-आत्या, मामी-मावश्या, शाळेतल्या बाई,शेजारच्या काकू, मैत्रिणींच्या आया...सगळ्याजणी काही 'लौकिकार्थानं  सुंदर' नव्हत्या पण तरीही किती छान दिसायच्या. त्यातल्या बहुतेक जणी कधी ब्युटी पार्लरची पायरीही चढल्या नसतील. स्नो, पावडर, शिंगारचे ठराविक रंगातले कुंकू किंवा पिंजर, केसांची वेणी किंवा अंबाडा, ठराविक फॅशनच्या साड्या आणि दागिनेही मोजके चार-पाच प्रकारचे.

एखादा समारंभ किंवा हळदी कुंकू असेल तर चापून चोपून नेसलेल्या ठेवणीतल्या जरीच्या नऊवार किंवा पाचवार साड्या, गळ्यात तन्मणी,नाकात नथ, केसात घरचं गुलाबाचं फूल किंवा गजरा. चेहेऱ्यावर तृप्त, शांत समाधान!! रवी वर्म्याच्या चित्राइतकंच सुंदर वाटतं मला हे आठवणीतलं चित्रं.   

आपल्या मुलांवरचं प्रेम, आवश्यक ती शिस्त आणि धाक, मुलांच्या आजारपणात काळजीनं येणारा हळवेपणा,मुलांची छोटी हौस-मौज , हट्ट पुरवण्यातलं समाधान, लहान सहान गोष्टींचं डोळ्यातलं कौतुक, श्रावणी शुक्रवारी किंवा अश्विनी पौर्णिमेला मुलांना ओवाळताना चेहेऱ्यावरचा सात्विक आनंद. या सगळ्या नितळ भावनांचं 'आईपण' चेहेऱ्यावर खुलून येत असेल का? कुठल्याच सौंदर्याच्या परिभाषेत मांडता येणार नाही असं,बाह्य सौंदर्याच्या पलीकडचं वेगळंच परिमाण. जे फक्त अनुभवता येतं, आतून जाणवत राहतं.

आणि आज इतक्या वर्षांनी सोनिया तेव्हा मला जे सांगू पाहत होती ते पुरतं समजलं. डोळ्याला भावणारं, लुभावणारं  सौंदर्य शोधायच्या नादात कुठेतरी ‘मनीचा भाव’ हरवून बसलो का आपण?

 मला आठवतं,सोनिया झाली तेव्हा संजूचे मामा , भाऊमामा हॉस्पिटल मध्ये एका छोट्याशा कागदाच्या पाकिटात माझ्यासाठी नारळाच्या बर्फीच्या चार वड्या  घेऊन आले होते. डोळ्यात नेहमीचे मिश्किल हसू आणि मला प्रेमाने म्हणाले " सुधामामीने ताज्या वड्या केल्यात. बघ आज तुझं आणि नातीचं तोंड गोड करायला घेऊन आलो”. त्या वड्यांवर ना बदाम पिस्त्याची नक्षी, ना केशराचा वर्ख. पण इतकी अप्रतिम चव आणि भरपूर मायेचा ओलावा. तसंच एकदा लग्न झाल्यावर आम्ही दोघं वेंगुर्ल्याला फाटकांचे गणपतीचे देऊळ आहे तिथे गेलो होतो. गावात एक चुलत घर आहे जे गणपतीची व्यवस्था बघतात. जेवायला रोजचा साधा स्वयंपाक. गोड म्हणून त्या आजींनी दुभत्याच्या कपाटातून दोन छोट्या दह्याच्या वाट्या काढल्या, वरून साखर घातली आणि आमच्या पानात ठेवल्या. आजींनी किती साधेपणात वेळ साजरी केली. नाही तर आज काल कोणाला जेवायला बोलवायचे म्हणजे आधी काय बेत करायचा ते ठरवायचे, त्या साठी दहा ठिकाणाहून सामान आणायचे. एक दिवस आधी घराची स्वच्छता, क्रोकरी काढा, मग जेवणाच्या दिवशी टेबलाची, घराची सजावट आणि मग दुसऱ्या दिवशी सगळं क्रमाने आवरा. मग एवढा उटारेटा करण्यापेक्षा सरळ बाहेरच भेटू किंवा बाहेरून मागवू.

खरंच सगळं सुंदर, perfect, छान करण्याच्या नादात आपणंच आपलं आयुष्य कॉम्प्लिकेटेड आणि दिखाऊ करून घेतलं की काय?

पूर्वी कुणाला साडी द्यायची पद्धत पण किती छान होती. आई साडीची घडी मोडून, निऱ्या करून, भोवतीने गोल पदर गुंडाळून, साडीला हळद कुंकू लावून मग ज्यांना द्यायची त्यांना कुंकू लावून हातात देत असे. कागदातून घडी काढताना कुठला रंग असेल ही उत्सुकता, नव्या कोऱ्या साडीचा वास, पोतावरून हळूवार हात फिरवून बघणं असं सगळं रंग, गंध,स्पर्श आणि मनाला भावणारं नव्या नवलाईचं सुख आता उत्तम सजवलेल्या साडी बॉक्स मध्ये कसं मिळणार ? कोणी आलं की ओटी भरून कापड देणं ही पद्धत आपल्या व्यवहारी (प्रॅक्टिकल) विचाराने आपण जवळपास बंदच करून टाकली. पण मला वाटतं , घरात असलेल्या गोष्टींमधून एकमेकांना काही तरी देऊन प्रेम व्यक्त करायची हीअतिशय साधी -सोपी आणि आताच्या भाषेत sustainable पद्धत होती.

 पूर्वीच्या ह्या साध्यासोप्या गोष्टी... पण 'निर्मळ आनंदाची' देवाण घेवाण होत होती. पंचेंद्रियांच्या जाणिवांच्या पलीकडच्या , अंतरीच्या खऱ्या खुऱ्या भावनांचं मोल जाणून ते तितक्याच प्रेमानं जपलं जात होतं.

आपला सगळा आनंद, समाधान, सुख, यश दिखाव्यात,Likes मोजण्याचा, status ठेवण्याच्या नादात  'सुदाम्याचे पोहे' खाणारा आपल्या मनातला कृष्णच आपल्यापासून दुरावला की काय ??


p.c. आनंदिनी क्षीरसागर, Google