" श्रीकृष्णार्पणमस्तु"
असं म्हणून लॅपटॉप कंपनीच्या इंजिनिअरकडे फॉरमॅटिंगसाठी सुपूर्त केला. एकदम शांतपणे. जराही
चलबिचल नाही. आदल्या रात्री हाच लॅपटॉप नीट
काम करत नव्हता तेव्हा
किती अस्वस्थ झाले होते मी.
लॅपटॉप चालू करण्यासाठी जे
काय उपाय करायला लागतात
ते सगळे केले आणि
जेव्हा तो चालू झाला
तेव्हा कुठे जीवात जीव
आला. गेली अनेक वर्षं
ज्याच्यात अक्षरश: जीव गुंतला होता
तोच हा लॅपटॉप. त्याच्यावरचा
अगणित डेटा,असंख्य मेल्स,
रिपोर्ट्स, प्रेसेंटेशन्स, फोटो आणि कित्येक
आठवणीसुद्धा. आता
फक्त आठवणी जवळ ठेवल्या. आवश्यक
तेवढा डेटा टीममध्ये वाटून
टाकला आणि उरलेला शांतपणे
'व्हर्चुअल' गंगेत सोडून दिला. किती हलकं वाटलं.
एखादं लहान मूल सतत
जवळ सांभाळत राहावं तसा हा लॅपटॉप
गेली २५ वर्षं नेहमी
खांद्यावर. कुठेही प्रवासाला जाताना हा बरोबरच. आता
एकदम 'सुटवंक ' वाटायला लागलं. संध्याकाळी बाहेर पडताना गळ्यातला कंपनीचा टॅग काढला. 'दुसरं
मंगळसूत्रं' असं आम्ही चेष्टेने
म्हणायचो. एकवार त्यातल्या माझ्या फोटोकडे पाहिलं आणि तोही सुपूर्त
करून बाहेर पडले.
आज विचार करताना आठवले असेच काही निरोपाचे
क्षण. काही कृतार्थ, काही
कृतज्ञ तर काही हळवे...
मला
आठवतंय, लहानपणी कोणी पाहुणे गावाहून
येणार असले की स्टेशनवर
आणायला जायला मी एका पायावर
तयार; पण हेच त्यांना
स्टेशनवर सोडायला जायची वेळ आली की
मी मागे. अगदी लहान असताना
माझी एक सख्खी मैत्रीण
तिच्या वडिलांची बदली झाली म्हणून
लांबच्या गावाला गेली. ती आणि तिची
आई रात्री निघताना आम्हांला सांगायला आल्या. उद्यापासून ती खेळायला नाही याचं मला
इतकं वाईट वाटत होतं
की मी तिच्याशी त्या
निरोपाच्या क्षणी नीट बोललेही नाही.
जसे
मोठे होत गेलो तसे
हे छोटे मोठे निरोपाचे
प्रसंग येत गेले. प्राथमिक
शाळेतून मोठ्या शाळेत जाताना किंवा दहावीतला शाळेतला निरोप समारंभ. आईची साडी नेसून
केलेलं भाषण,थोडंसं रडणं
आणि त्याबरोबर कॉलेजच्या नवलाईची उत्सुकता. शाळेतल्या शास्त्रीबाईंच्या अकाली निधनानंतर त्यांना शाळेच्या मैदानावर दिलेला अश्रुपूर्ण निरोप ...
माझं आता पर्यंतचं सगळं आयुष्य पुण्यातच गेलं. वडिलांचा वैद्यकीय व्यवसाय असल्याने बदलीचा प्रश्नच नव्हता. शिक्षण, लग्न सगळं पुण्यात. पुढे संजू मुंबई, दिल्ली असा कामासाठी राहिला तरी आम्ही घट्ट पुण्यात. त्यामुळे घराला, गावाला निरोप द्यायचे प्रसंग कमी आले. पण जे आले ते मात्र हळवे करणारे. नवीन मोठ्या घरात आलो तरी पूर्वीचे घर सोडताना फार जड गेलं. कित्येकदा संध्याकाळी त्या घराच्या आठवणींनी दाटून येत असे. एखाद्या घरात आपण थोडे दिवस जरी राहिलो तरी तिथे मन गुंतायला लागते. परत आठवणी जमायला लागतात आणि म्हणूनच मग जेव्हा यश ग्रीन्सबोरोचे घर सोडत होता किंवा सोनियाने घर बदललं तेव्हा बरेचदा मी व्हिडीओ कॉलवर ती घरं डोळे भरून पाहून घेतली. देश परदेशात कुठेही गेले तरी निघताना मी खूप मनापासून त्या गावचा, तिथल्या लोकांचा, तिथल्या निसर्गाचा निरोप घेते आणि “आपण पुन्हा नक्की भेटू या” असं मलाच समजावते. घरचे सगळे माझी चेष्टा करतात पण मी मधूनच सोनियाला विचारते, " जेफर्सन मेमोरियल काय म्हणतंय ? रॉसलिनला (म्हणजे तिथलं मेट्रो स्टेशन) माझा Hi सांग". आणि त्या ठिकाणांना परत भेटल्यावर मला खरंच खूप आनंद होतो.
पूर्वी घरी कोणी पाहुणे राहायला आले की त्यांना " तुम्ही किती दिवस राहणार आहात?" असं मी विचारत असे. हा कितीही 'पुणेरी आगाऊपणाचा' प्रश्न वाटला तरी माझ्या मनाच्या निरोपाच्या तयारीसाठीच तो असायचा. आता इतकं मोठं झाल्यावर मुलं जेव्हा काही आठवड्यांसाठी भारतात येतात तेव्हा आनंदानं त्यांचं स्वागत करताना,त्यांच्या आवडीचे पदार्थ करून खायला देताना, त्यांच्याबरोबर फिरताना ती निरोपाची तारीख मनात कुठेतरी भिरभिरत असते. आणि मग तो दिवस येतो. सकाळपासून उगीचच चिडचिड, मध्येच एकमेकांना उपदेशाचे सल्ले (म्हणजे लेक्चर), काही विसरलं नाहीयेना म्हणून उगीचंच बॅगेची उचकापाचक असं काही बाही चाललेलं असतं. निघताना ओवाळून हातावर दही देताना सगळं उसनं अवसान गळून पडतं. एअरपोर्टवर एकाचवेळी रडव्या आणि हसऱ्या चेहेऱ्याचा सेल्फी आणि अश्रूंचा बांध थोपवून एक घट्ट मिठी!! पूर्वी अगदी दारापाशी उभं रहायची परवानगी असायची. तेव्हा मग एकदा या काचेतून बघ , त्या काचेतून बघ असं करत चेक इन करून सिक्युरिटीला निघेपर्यंत bye करता यायचं. परत परत निरोप घ्यायचं वेडं समाधान!!
गणपती विसर्जनाच्या वेळेस पण अशीच हूरहूर आणि म्हणूनच मला वाटतं तीनदा गणपतीची मूर्ती पाण्यात बुडवून बाहेर काढायची आणि मग विसर्जन करायची पद्धत असावी. पहिल्या दिवशी मोदक करायचा उत्साह विसर्जनाच्या शिदोरीचे कानवले करताना पार मावळलेला असतो. गणपती घरी आल्यावर घंटा वाजवत सगळं घर फिरून दाखवल्यावर, निघताना मात्र घर दाखवणं एक उपचार उरतो. ताटात मूर्ती काढून ठेवल्यावर रिकामं मखर बघताना त्रास होतो. "पुनरागमनायचं " असं म्हणून बाप्पाला निरोप देताना माहित असतं की तो पुढच्या वर्षी नक्की येणार आहे. पण जेव्हा आपल्या जिवलगांना अखेरचा निरोप द्यायची वेळ येते तेव्हा शिकलेलं सगळं शहाणपण, वाचलेले सगळे सिद्धांत काही म्हणता काही आठवत नाही. “आता आपलं हे माणूस परत दिसणार नाही” एवढी एकच गोष्ट त्या क्षणी कळत असते आणि मग उरते फक्त ते तुटपुंजे क्षण साठवून ठेवण्याची पराकोटीची धडपड…
मग काही दिवस गेल्यावर थोडंसं भान येतं आणि जाणवतं की शारीर रूपात नसले तरी आपल्याजवळच आहेत ते. आठवणींतून, जीवनमूल्यांतून, संस्कारांमधून, कळत नकळत मिळणाऱ्या मार्गदर्शनातून त्यांच्याशी संवाद चालूच राहतो आणि होते मग त्या नात्याच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात.
खरं तर प्रत्येक निरोप हा कुठेतरी एका नवीन सुरुवातीशी जोडलेला असतो. नवीन सुरुवातीवरून आठवलं, सोनियाचं लग्न. लग्नाआधी चार वर्षं आमच्यापासून लांब असली, आता यशासारखा छान जोडीदार मिळाला असला, आमच्याइतकंच प्रेम करणारे अजून एक आई बाबा मिळाले असले तरी तिची पाठवणी करताना इतकं रडू आलं. कोणाच्याही लग्नात मंगलाष्टकाचे सूर जरी ऐकले तरी मला दाटून येतं. आमच्या ओळखीच्या एक आजी होत्या. त्या म्हणायच्या " मुलीची पाठवणी हा किती आनंदाचा क्षण आहे. तिच्या नव्या संसारासाठी तिला हसतमुखाने निरोप द्या". आजीचं म्हणणं कळतं पण वळत नाही.
एक वर्तुळ पूर्ण होऊन दुसरं सुरु
होत राहणार हाच तर सृष्टीचा
नियम आहे. आपण त्या
वर्तुळात कुठे उभं रहायचं
ते आपण ठरवायचं.
माझ्या
बाबांचं एक वाक्य कायम
माझ्या लक्षात राहिलं आहे. "आयुष्यात कुठे थांबायचं ते
कळलं पाहिजे ". कुठल्याही बाबतीत ते लागू होतं.
बोलताना, वागताना, नाती निभावताना, झोकून
देऊन काम करताना, अगदी
कुठल्याही बाबतीत.
आताशा
माझ्या लक्षात आलं की व्यावसायिक
जबाबदाऱ्यांतून मोकळं होऊन स्वतःसाठी, आपल्या
माणसांसाठी 'वेळ' काढायला हीच
योग्य 'वेळ' आहे. अतिशय
समाधानी,आनंदी कारकीर्द असतानाच तिचा 'निरोप' घेणं श्रेयस्कर. आणि
म्हणूनच गेले काही महिने
मी या 'निरोपाची' तयारी
करत होते. हा नुसताच कामाचा किंवा संस्थेचा निरोप नव्हता तर २५-30 वर्षांच्या
अनेकविध अनुभवांनी माझं जगणं सर्वार्थाने समृद्ध करणाऱ्या
कारकिर्दीचा,त्या
त्या काळात मिळालेल्या अधिकारांचा, हक्कांचा , सवलतींचा (privileges), त्या पदाचा (Role and Title), वेगवेगळ्या व्यासपीठावरील
नेतृत्वाचा, मान-सन्मानांच्या संधींचा
हा निरोप होता. काही दिवसांपूर्वी एक
ठिकाणी ओळख करून देताना
मी जाणीवपूर्वक माझ्या कामाचा, माझ्या पदाचा उल्लेख टाळला आणि फक्त 'वैशाली
' म्हणून माझी जी काय
ओळख आहे तीच सांगितली.
कुठेतरी एक छान निवृत्तीची,
‘समजूतदार विरक्तीची’ भावना झिरपत गेली होती आणि
म्हणूनच माझा निरोप समारंभ
मी अगदी मनापासून साजरा
केला.
असाच
एक मनस्वी निरोप मी काही वर्षांपूर्वी
माझ्या गर्भाशयाला आणि अंडाशयाला दिला.
पुरेसे उपचार करूनही जेव्हा उपयोग झाला नाही तेव्हा
complete hysterectomy करायचे
ठरले. शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी मी डोळे मिटून
शांतपणे ध्यान केलं. आजवरच्या माझ्या 'स्त्रीत्वाच्या प्रवासाच्या' वेगवेगळ्या टप्प्यावर या दोन अवयवांनी
जी मोलाची साथ दिली त्याबद्दल
मी त्यांचे मनापासून आभार मानले. दुसऱ्या
दिवशी कोणीतरी म्हणाले, "It won't
trouble you anymore. It’s a specimen now." मी
समजुतीने हसले. I knew it was much
more than ‘the specimen’!!
विचार करताना
वाटतं, आपला शेवट
कधी, कसा, कुठे होईल
माहित नाही पण जर
देवाने तो क्षण निवडायची
संधी दिली तर तो
कसा असेल?
१० वर्षांपूर्वी पहिल्यांदा युरोपला गेले होते. "Nice is Love" म्हणून तिथेच रमलेल्या माझ्या पुतणीबरोबर नीसचा अप्रतिम निळाशार समुदकिनारा, समुद्राच्या काठाने डोंगरवाटातून मोनॅको, मॉन्टेकार्लोला भेट, वाटेतली टुमदार गावं, वास्तुकलेचे सौंदर्य मिरवणाऱ्या इमारती आणि चर्चेस. पहिल्याच भेटीत मी युरोपच्या पार प्रेमात पडले आणि अजूनही त्याच प्रेमात आहे. नीसहून पॅरिसला जायचा दिवसभराचा ट्रेनचा प्रवास. सकाळी लवकर स्टेशनवर पोचलो. स्वच्छ सूर्यप्रकाश, हलकी थंडी, वाऱ्याच्या आल्हाददायक झुळका, सभोवती छान इमारती, त्यांच्या खिडक्यांबाहेरची सुंदर रंगीबेरंगी फुलझाडं, वातावरणात सकाळची मस्त ऊर्जा, हातात पॉल बेकरीतल्या कॉफीचा वाफाळता कप. आणि तितक्यात एक मुलगी स्टेशनच्या आवारात ठेवलेला पियानो वाजवायला येऊन बसली. त्या पियानोतून उमटणाऱ्या अद्भुत स्वरांनी अंगावर रोमांच उभे राहिले. डोळ्यांतून या जन्माबद्दलची कृतज्ञता, समाधान सगळंच पाझरायला लागलं. ‘ब्रह्मानंदी समाधी लागणं’ असं जे काय म्हणतात साधारण तसाच अनुभव आणि त्या क्षणी मी देवाला म्हटलं " रामराया, आत्ता, इथे, या क्षणी मला उचलून नेलंस तर मी यायला आनंदाने तयार आहे" आणि खरंच मी तृप्तीने डोळे मिटून घेतले. एका चांगल्या अर्थाने "आपुले मरण पहिले म्या डोळा" असा हा अनुभव प्रत्यक्षात उतरला आणि इतक्या सहजपणे, निर्मोहीपणे हसत हसत जगाचा निरोप घेता आला तर?
वैशाली फाटक
२० एप्रिल , २०२५
खूप सुरेख लिहिल आहे फाटक मॅडम.
उत्तर द्याहटवानिरोप घेणे खरंच खूप अवघड असते. आणि इथे तर पंचवीस पेक्षा जास्त मोठ्या बाळाला, पदाला निरोप द्यायचा होता तुला..पण तो तू अतिशय gracefully दिलास...third person perspective.
उत्तर द्याहटवाखूप शुभेच्छा!
खूपच छान. आयुष्याचे एक एक महत्वाचे आणि कधी वरकरणी महत्त्वाचे न वाटणारे टप्पे ज्यांचे आंतरिक मोल त्या व्यक्तीलाच असते, ते सगळ्यांपर्यंत छान पोचवले आहेत. जबाबदारी मुक्त अशा आयुष्याच्या नवीन पर्वासाठी खूप शुभेच्छा. तसेच हूर हूर लावणाऱ्या पण शेवटी मुक्त करत जाणाऱ्या अनेक स्वल्पविरामांसाठी देखील शुभेच्छा.
उत्तर द्याहटवाLetting something go is the most difficult thing we have to do. You described various moments where everyone has to let go of something beautifully.
उत्तर द्याहटवाUltimate..khoopach sundar lihile aahe
उत्तर द्याहटवानोकरीतल्या निरोपाच्या निमित्तानी खूप व्यापक विचार मांडला आहेस. नेहमीप्रमाणेच समर्पक .
उत्तर द्याहटवाकॉर्पोरेट identity हा आपल्या self image चा एक मोठा भाग असतो. त्याच्या शिवाय स्वतःची ओळख दुसऱ्याला introduce होताना सांगू शकणे हा एक liberating experiment असतो
Enjoy the new innings
काय बोलू आणि लिहू. माझ्याच मनाचा आरसा मला वाचायला मिळाला. अगोदर ही तुझे ब्लॉग वाचताना मला हाच अनुभव आला होता वैशाली. यालाच नाळ जुळणे की काय म्हणतात ते असावे. इतके तरल, संवेदनशील मन असणे आणि त्या संवेदना शब्दात अगदी परफेक्ट उतरवणे म्हणजे एक विशेष दैवी देणगी आहे खरेच. पण त्यामुळे समोरच्या व्यक्तीला नक्की असे वाटत असेल की किती घायाळघंटी (माझ्या आईचा खास शब्द) आहे हा/ही. मी हि असाच आहे अगदी सेम टू सेम. छोट्या छोट्या सजीव, निर्जीव वस्तू आणि आठवणीं मध्ये गुंतून पडणारा. मागच्या वर्षीची न्युझीलंड ट्रीप अशीच होती. आम्ही रहात असलेल्या जागेशी आणि तिथल्या निसर्गाशी इतकी जवळीक आणि बांधिलकी झाली की निघताना पाय जड आणि डोळे भरून आले. अजूनही आठवणीने पोटात ढवळून येतंय. तीच बाब सोडून गेलेल्या जवळच्या आप्त मित्रांची. कधी कधी वाटतं इतके गुंतून पडणे बरे नव्हे. पण माणसाचा DNA बदलणे सध्या तरी शक्य नाही, त्यामुळे जे आहे ते निभवायचे.
उत्तर द्याहटवाआयुष्याच्या पुढील प्रवासात तुला अनेक, भरभरून शुभेच्छा वैशाली. लिहिती रहा.
अतिशय अर्थपूर्ण प्रतिक्रिया...वाचनीय...
हटवाVery well written! I have gone through the same experience and I could very well relate to it. I thought as if I am going through that experience again. I can very well understand how it feels to leave the empire we have created by doing so much hardwork especially many times sacrificing our family life, kid’s childhood and so many things in life.
हटवाजातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च - हे स्वयं श्रीकृष्णाने सांगितले आहे. जीवनाला हे लागू आहे तसेच आपापल्या जीवनाशी निगडित अन्य गोष्टींनाही हे लागू आहे. ज्या तटस्थपणे तुम्ही हे विचार मांडले आहेत ते आपल्या प्रगल्भतेचे द्योतक आहे. नवीन अनुभवांची शिदोरी आपली वाट बघत आहे. ती स्वीकारून आपण आपली वाटचाल सुरूच ठेवाल ही खात्री बाळगतो.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवावैशाली
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर मनापासून व्यक्तता आहे ही...
निरोप ... किती निकोप, निरागस, निरातिशय सकारात्मक आहे
एका गोष्टीचा निरोप घेताना नवीन गोष्टीची सुरुवात होतेच...अशा अनेक नवीन सुरुवातींसाठी हार्दिक शुभेच्छा
वैशाली, खुप छान विचार मांडले आहेत. नवीन पर्वा साठी शुभेच्छा
उत्तर द्याहटवाखूपच छान लेख वैशाली (वैगो)! निरोप (आणि अर्थातच पुढच्या टप्प्याची सुरुवात) या संकल्पनेच्या वेगवेगळ्या छटा सुंदर व्यक्त झाल्या आहेत. प्रत्येक गावातून निघताना किंवा वास्तुचा निरोप घेताना तिथे आपले काही भावनिक अडकून राहते आणि त्याबरोबरच तिथले काही आपण बरोबर घेऊनही जात असतो, नव्या प्रवासाची हुरहूर अशी विचित्र कडू गोड चव असते म्हणूनच बहुतेक निरोप 'देणे आणि घेणे' दोन्ही म्हणतात!
उत्तर द्याहटवाVaishali, such beautiful thoughts.. तुझ्या रिटायरमेंट ने एक पर्व संपले असे वाटले.. but I am sure you will make the post retirement equally fruitful..
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर तरल लेख, २५ वर्षाचा "संसार" एक दिवस सोडून जायचं आहे हे माहित असूनही त्रास होणारच. पण तू तुझ्या भावना अतिशय समर्पक शब्दांत मांडल्या आहेस. तुझे छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. असेच सुंदर ब्लाँग लिहीत राहा. Welcome to Ex TechM club.
उत्तर द्याहटवावैशाली, तुझे सगळेच लिखाण छान असते. हा ब्लॉग बर्याच दिवसांनी आलात. पण "देरसे आये लेकिन दुरुस्त आये' असं झालं. कॉर्पोरेट जॉबच्या निरोपाची कथा आणि व्यथा मस्त मांडलीसच पण पूर्वायुष्यात निरोपाच्या क्षणांच्या आठवणीही सुंदर उलगडल्यास. लहानपणीचे पाहुणे, मुलांचे परदेश प्रवास आणि लग्नं, गर्भाशय निरोप असं सारं काही तरलपणे व्यक्त झालंय. कामातून निवृत्ती हा आपल्या मनाला कासावीस करणारा क्षण खरा पण आजूबाजूचे मात्र तटस्थ असतात हे खरं. अशीच लिहीत राहा. नवीन पर्वाच्या शुभेच्छा!
उत्तर द्याहटवाClosure असा एक शब्द वापरला जातो. निरोप म्हणजे closureआहे असं जाणवलं मला. आणि काहीतरी संपतं तेव्हा काहीतरी नवीन सुरू होतं हेहि तितकंच खरं. अतिशय तरल, संवेदनशील आणि ह्रदयस्पर्शी लेखन...असं लेखन वाचणंही therapeutic असतं. नवीन सुरूवातींसाठी आणि असंच सकस लेखन तुझ्या हातून होत राहण्यासाठी खूप खूप शुभेच्छा...
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलं आहे वैशाली.. इतका शांतपणे निरोप घेताना मनाची जी परिपक्वता लागते तीच खरी निवृत्ती 👍👍
उत्तर द्याहटवाआयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरच हे क्षण येतात आणि तू ते अतिशय सुंदर व्यक्त केले आहे ❤️
अप्रतिम लेख ! खूप दिवसांनी तुझं लिखाण वाचून छान वाटलं. मला तुझा तो ऑफिस मधून बाहेर पडण्याचा क्षण आठवतोय , ती सहजता बघून त्यावेळी आश्चर्य वाटलं. ह्या लेखामध्ये त्यामागचा विचार जाणवला. ❤️❤️ अशीच लिहीत रहा.
उत्तर द्याहटवाकाय सहज सुंदर लिहलं आहेस ग वैशाली, खूप छान. वाचताना मी ही कळत नकळत emotional झाले.
उत्तर द्याहटवाखूपच छान विचार मांडला आहेस वैशाली साध्या सोप्या भाषेत. Since I have recently retired from my job, I could relate with your feelings. जीवनातले अनेक निरोप समारंभ concept मनाला खूप भावली !
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लिखाण... सोपं नसतं एवढ्या busy schedule मधून मोकळं होणं आणि त्या पेक्षा ही ते मोकळेपण स्वीकारणे... वाचता वाचता मी अनुभवलेले निरोप समारंभ डोळ्यासमोर तरळून गेले... Wish you a very happy and happening second inning!!!
उत्तर द्याहटवावैशाली, तुझे ब्लॉग्स त्या वर्षातून एकच पण मास्टरपीस देणाऱ्या दिग्दर्शकांसारखे असतात. हाही त्याला अपवाद नाही. साधारण एकाच वेळी MBT मध्ये आपण जॉइन झालो त्याला एकवीस वर्षे कधी उलटून गेली समजलंच नाही. सुरवातीची काही वर्षे सहकारी म्हणून काम केल्यानंतर तुला नेतृत्वाची संधी मिळाली त्याचं तू चीज केलंस. मात्र ती जबाबदारी यशस्वीपणे पेलताना, अनेक आव्हानं झेलताना सुरवातीच्या आम्हा सहकाऱ्यांना कायम बरोबरीची, मित्रत्वाची वागणूक दिलीस. कोणतेही निर्णय आपण मिळून चर्चा करून घेतले आणि त्यांच्या यशापयशाची जबाबदारीही एकत्रच घेतली. कॉर्पोरेट जगात यश मिळवायचं, वरवरच्या पायऱ्या चढताना वर्षानुवर्षे गिरवले गेलेला पुरुषी अग्रेसिवनेस, प्रेशर टॅक्टिक्स हे पार्ट ऑफ द गेम असतात हा समज तू तुझा सहवेदनशील स्वभाव कायम जपत खोटा ठरवलास. संधी येतात आणि जातात, पण त्या वावटळीत आपण स्वतःला हरवायचं नसतं हे तू नेहेमीच फॉलो केलंस. या काळात आपले लीडर्स कितीतरी बदलले. प्रत्येकाशी जुळवून घेताना, त्यांची स्वप्नं, त्यांचे महत्त्वाकांक्षी प्लॅन्स आपण आपले मानून दर वेळी त्यात आपले सर्वस्व ओतले. पुन्हा नवीन व्यक्ती वर आली की आधी केलेलं तेच सगळं शांतपणे प्रवाहात जाऊ देऊन नवा गडी नवा राज हे तत्व स्वीकारलं. या काळात कितीतरी चेहरे आपल्या टीम मध्ये आले आणि आपल्याला खूप काही देऊन त्यांच्या उत्कर्षासाठी निघूनही गेले. आपण कोअर टीम मात्र तसेच घट्ट राहिलो. कशासाठी? याचं उत्तर कदाचित आपल्याला देता येणार नाही. तुझ्या फेअरवेल कॉल मध्ये तू तुझं ते signature "सलोना सा सजन है" गाणं म्हणालीस. नेहेमीप्रमाणेच अत्यंत सुरेल आवाजात. सगळ्यांनी नेहमी प्रमाणेच वाहवा ही केली. पण का कुणास ठाऊक, गेली काही वर्षे मला हे गाणं म्हणताना तुझ्या चेहेऱ्याआड लपलेली करियर आणि घरदार यांच्यात गाणं करता आलं नाही ही खंत जाणवायची. ब्लॉग तू सुंदर लिहिलासच, पण शेवटाकडे इतकी सर्व संगपरित्याग निवृत्तीची भावना अस्वस्थ करून गेली. ही भावना तात्पुरती ठरावी आणि एका नव्या आयुष्याला उत्फुल्ल सुरवात होवो ही सदिच्छा. या प्रवासात तू दूर जाताना खिडकीतून बाहेर पाहताना, झाडं मागे पळताना आरशात आम्हा उरलेल्या कोअर टीमचे चेहरे दिसतील तेंव्हा त्या आरशावरची अक्षरं लक्षात असू दे.. Objects in the mirror are closer than they appear.. खूप खूप शुभेच्छा 🎉
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिले आहे.मनापासून अतिशय प्रामाणिक प्रगट होणे घडले आहे.
हटवानिवृत्तीचा खूप शांत व समंजस स्वीकार केला व स्वागतही केले आहे.हा नवीन टप्पा तुला आनंददायी होवो
हटवावैशाली, वाचताना प्रत्येक प्रसंग आपण अनुभवतो आहोत असं वाटल, अशीच लिहीत रहा. 🥰🥰
उत्तर द्याहटवाओघवती भाषा आणि सुंदर शैली, खूप छान वैशाली. 👏💐
उत्तर द्याहटवाHey Vaishali,
उत्तर द्याहटवाI just finished reading your latest blog and I have to say - it was very beautifully written. The way you touched upon the various stages of life where we’re called to let go and say goodbye was so thoughtful and deeply resonated with me. I really appreciated the unique perspective you brought in; it made me pause and reflect.
You truly have a gift with words, and I genuinely believe writing could be an amazing second innings for you, now that you’ve wrapped up your professional chapter. Please keep blogging - you have so much to share, and the way you express it is nothing short of inspiring.
Looking forward to reading more from you!
So many emotions in this article Vaishali. It is always a heart wrenching feeling to say goodbye. I truly hope that you get plenty of joy in everything and everyone you say Hello to.
उत्तर द्याहटवाखूपच छान. निरोप या विषयावरही इतकं लालीत्यपूर्ण लिखाण! किती वेगवेगळेया प्रकारचे निरोप! असंच लिहीत रहा.
उत्तर द्याहटवातुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियाही इतक्या अर्थपूर्ण आहेत. प्रत्येकाने कुठे ना कुठेअसेच अनुभव घेतलेले असतात फक्त ते नेहमीच शब्दबद्ध होतात असं नाही पण ब्लॉग वाचताना मात्र ते सहज आठवतात, relate होतात आणि काहींच्या आठवणी इथे शब्दात उतरतात. तुमच्या प्रोत्साहनासाठी खूप खूप धन्यवाद.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवावैशाली,
उत्तर द्याहटवाआपली व्यवसायिक कारकिर्द अतिशय उत्तम रीतीने पूर्ण करून अभिमानाने, समाधानाने आपल्या व्यवसायातून निवृत्ती स्विकारते आहेस...यासाठी तुझे मनापासुन हार्दिक अभिनंदन आणि आयुष्यात पुढे आनंदाने मार्गस्थ होण्यासाठी शुभेच्छा!🙂👏👍
आजच्या प्रचंड व्यस्ततेच्या, व्यवसायिक स्पर्धेच्या जगात, धावपळीत 'त्याला' न विसरता, 'श्रीकृष्णार्पणमस्तू' करीत सगळे कर्म त्याला अर्पण करीत निरोप घेतलास, हे 'त्याला' ही नक्कीच आवडले असणार!🙂
आपल्या प्रिय वडिलांच्या बहुमुल्य सल्ल्याचेही स्मरण ठेवलेस हे सुद्धा महत्वाचे!
आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर बदल स्विकारतांना, निरोप देतांना, घेतांना संवेदनशील मन साहाजिकच हळवे होते. त्या सगळ्या प्रसंगांचे, बदलांचे अतिशय समर्पक वर्णन, मनोगत तू आपल्या लिखाणातून व्यक्त केले आहेस. मला खरोखरीच आवडले.
आणि मुख्य म्हणजे इतकी वर्षे व्यवसायिक (कार्पोरेट) जगात राहूनही आपल्या मायबोलीची नाळ तूटू दिली नाहीस. आयुष्याबद्दलचे आपले सुंदर मनोगत 'साहेबा'च्या कॉर्पोरेट भाषेत व्यक्त न करता त्या अस्खलित, सुंदर मायबोलीत व्यक्त केल्यास याचे मला कौतुक वाटले. कारण मायबोलीचा वापर आजकाल सहसा दिसत नाही. अगदी पुण्यातसुद्धा!🙂
या पुढे तू मराठीत छानपैकी नक्कीच भरपूर लिखाण करू शकशील असे वाटते. कदाचित ते तू अगोदरच ठरविले असशीलही.
प्रिय मित्र संजय आणि तुला, तुम्हा दोघांनाही आयुष्यातील पुढील सुंदर प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा! तुम्हा दोघांशीही जसे जमेल तसे भेटायला, बोलायला मला नक्की आवडत राहील.
तुझे हे सुंदर मनोगत आठवणीने वाचायला दिलेस त्यासाठी धन्यवाद! 🙂🙏👍
वैशाली, खूप छान, सहज, सोप्या भाषेत लिहिलं आहेस. आणि तुझे काही अनुभव तर अगदी आपलेच आहेत असं वाटलं.
उत्तर द्याहटवाखरच, कुठे आणि कधी थांबायचं हे आपण आपल्या चॉइस ने ठरवण्यात मजा आहे.
सगळेच निरोपाचे प्रसंग आणि त्यावेळी असलेली तुझी मनस्थिती, तुझे विचार अतिशय सुंदर आणि ओघवत्या शैलीत मांडले आहेस. अशीच लिहित रहा.
वैशाली, इतकी वर्ष सातत्याने एक करिअर वूमन म्हणून ज्या ग्रेसने आयुष्य घालवलंस तितक्याच ग्रेसने करिअरमधून बाहेर पडलीस. तुझी प्रगती आणि उन्नती पाहून नेहमीच छान वाटायचं. तुझा अभिमान वाटायचा. आता तुझा प्रवास निरोपाकडून नवीन आरंभाकडे सुरु झालाय. त्या प्रवासासाठी तुला हृदयपूर्वक शुभेचछा. गात रहा. लिहीत रहा. मुशाफिरी कर. मधून मधून फोन आणि घड्याळाच्या काट्याशी कट्टी foo कर. छान मजेत रहा.
उत्तर द्याहटवावैशाली, खुप सुंदर, परिपक्व आणि ओघवते विचार मांडले आहेस. नवीन पर्वा साठी खूप खूप शुभेच्छा. Happy new beginnings
उत्तर द्याहटवानिरोपाच्या वेळा ( गोड आणि कटू )अनेकदा अनुभवल्या आहेत त्यांना शब्दरूप मिळालं या ब्लॉग मधून. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्या त्या वेळच्या आपल्या वकुबानुसार निरोप दिले आणि घेतले जातात, पण मनात खोल कुठेतरी ते अडकून बसतात. निरोपाच्या पुढच्या प्रत्येक वेळी मनातून काही क्षणाकरता ते अलगद सुटतात आणि हळवं करून जातात.कितीही नको वाटले तरी निरोपाच्या क्षणामुळे अनेक गोष्टींना पूर्णविराम मिळतो. आयुष्याचा अविभाज्य भाग इतक्या सुंदर पद्धतीनं शब्दबद्ध केला आणि आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल तुमचे सप्रेम आभार.
उत्तर द्याहटवावैशाली, अतिशय सुरेख. कधी आणि कुठे थांबायचे ते तुला वेळेत उमगले आणि ते तू काटेकोरपणे पाळले... हा फार मोठा निर्णय तू जो सहजपणे आणि हसत हसता घेतला हे फार कौतुकास्पद आहे. भल्या भल्यांना हे जमत नाही.
उत्तर द्याहटवातुला निरोप देण्याचा प्रश्नच येत नाही कारण आपण भेटतच राहणार आहोत.
असेच लिहित रहा आणि तुझे गाणे परत चालू कर..